You are currently viewing सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय….

सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय….

मराठा समाजाच्या प्रयत्नांना मोठे यश

मुंबई:
मराठा समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं मराठा समाजानं स्वागत केलं आहे.
‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर सरकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण आल्यानं मर्यादा आल्या होत्या. निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यासह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्या होत्या, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी केला होता.
सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी वर्षभर आंदोलनं झाली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता ‘सारथी’ला स्वायता बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, सारथी बंद होणार नाही असे सांगताना आठ कोटींचा निधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. सारथी संस्थेला १ हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून ही संस्था विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन अधिक चर्चेत आली. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. आपण ओबीसी असल्यानं मला टार्गेट करण्यात येत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =