You are currently viewing पंचगंगा नदी प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करता येईल – शशांक बावचकर

पंचगंगा नदी प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करता येईल – शशांक बावचकर

इचलकरंजी :

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सर्वच धर्मातील सण व उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी दोन वर्षे असलेले काही निर्बंध हटवण्याचे जाहीर केले आहे. तथापि राज्यातील कायदा व सुव्यवस्था, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक तत्वे याचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये काही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करणार व त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांची परवानगी आणणार अशा आशयाचे निवेदन जाहीर केले आहे. तथापि पंचगंगा नदी प्रदूषित न करता गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येईल, असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे व्यक्त केले आहे.

इचलकरंजी शहरामध्ये 2016 सालापासून ‘ श्रीं ‘ च्या मूर्तीचे विसर्जन शहापूरच्या खणीमध्ये करण्यास सुरुवात झाली होती. 2016 साली 14 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये झाले होते. तसेच गेल्या दोन वर्षात तर सर्वच म्हणजे 100% गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये झाले होते. त्यामुळे इचलकरंजी शहराची जीवनदायीनी असणा-या पंचगंगा नदीचे पात्र हे स्वच्छ राहिले होते. असे असताना माजी आमदार हळवणकर यांचे काही समर्थक व स्वतः विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र सवंग लोकप्रियतेसाठी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करणार अशी धक्कादायक भूमिका घेतली. विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी 2019 मध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी “पंचगंगा नमोस्तुते” हा कार्यक्रम राबवून शहरामध्ये विविध ठिकाणी या विषयावर पथनाट्य सादर केले होते.

तसेच दोनच महिन्यापूर्वी एका वर्तमानपञाने काढलेल्या जलदिंडीचे स्वागत करताना माजी व विद्यमान आमदारांनी प्रदूषणावर लांबलचक भाषण केले होते. असे असताना या जबाबदार लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या भूमिका बदलण्याचे नेमके कारण काय ? सवंग लोकप्रियतेसाठी शहरातील तरुणांना वेगळ्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न नव्हे का ? असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे उपस्थित केला आहे. तसेच सर्व धर्मीयांना सर्व उत्सव उत्साहात साजरे करण्यास प्रशासनाने कधीही नकार दिला नाही. इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापर्यंत विविध ठिकाणी गणेश मंडळांचे स्वागत करणे व स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देवूनसुद्धा गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करता येऊ शकते.

त्यामुळे पंचगंगा नदीचे पात्रही स्वच्छ राहील व सण ही उत्साहात साजरा होईल. या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सवंग लोकप्रियतेसाठी तरुणांना चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न थांबवावा व शहराचे सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी देखील शशांक बावचकर यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा