You are currently viewing राज्यसभा निवडणूक ज्यांच्या हाती ससा तो पारधी!

राज्यसभा निवडणूक ज्यांच्या हाती ससा तो पारधी!

प्रमोद कांदळगावकर : भांडुपगाव-मुंबई

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून चुरस कायम होती.दुहेरी बाजूने प्रतिष्ठापणाला लागली होती. आश्वासने देऊन सात मतें फुटली आणि ज्यांच्या हाती ससा तो पारधी या उक्तीप्रमाणे भाजपाने मैदान मारले . यातून विधानपरिषद निवडणुकीची धाकधूक वाढली. यावर भाष्य करणारा लेख! राज्यसभेसाठी सहा जागांसाठी मतदान जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजप यामध्ये दुहेरी प्रतिष्ठापणाला लागली. त्यानंतर प्रत्येक दिवस दावे प्रतिदावे दोन्ही बाजूंनी करण्याची स्पर्धा लागली होती.यात कुणी कमी नव्हते.आम्हीच जिंकणार असे सांगितले जात होते.दररोज रणनिती आखली जात होती. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची एकत्र ताकद आणि अपक्षांचा पाठिंबा सरकारच्या बाजूने अशी लढत असताना शिवसेना आणि भाजप मध्ये प्रथम चुरस वाढली. सदर निवडणूक भाजपाने सातवा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने दिल्याने प्रारंभापासून धाकधूक वाढतं होती . भाजपाने एका बाजूला प्रस्ताव दिल्यासारखे केले.पण आपला उमेदवार कायम ठेवून त्या दुष्टीकोनातून प्रयत्न चालू ठेवले. त्यात ते यशस्वी ठरले. भाजपचे धनंजय महाडिक यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव होता. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमालीचा दिसून आला हे यानिमित्ताने नमूद करावे लागेल. त्यामुळे ही निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत शिवसेना विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशीच झाली . त्यातच फडणवीस यांना कोरोना झाला . त्यांच्याकडे मोकळा वेळ होता तो त्यांनी बऱ्यापैकी कारणी लावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोशल नेटवर्किंग माध्यमातून जनजागृती करताना प्रचार आणि प्रसार कसा करावा याची गणिते मांडण्यात भाजपा माहिर आहे. मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यात पोटनिवडणूक झाली .त्यात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष पक्षांमुळे विजय मिळाला. त्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला . अशा पराभवातून खचून जायचं नाही. उलट अधिक जोमाने पुढे येणाऱ्या निवडणुका तेवढ्याच ताकदीने जिंकून कार्यकर्त्यांची उमेद वाढवायची अशी भूमिका वठवली जाते . तथापि शिवसेने संजय पवार यांना राष्ट्रवादीचा अतिरिक्त मतांचा कोटा मिळणार होता.त्यामुळे रिंगणात उतरविले. खरंतर राज्यसभा व २० जूनला होऊ घातलेली निवडणूक लक्षात घेऊन भाजपाने फासे टाकले. भाजपने अटीशर्थी टाकून अटीतटीचा सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला . मग त्यासाठी साम दाम दंड भेद यांचा वापर करून दुहेरी बाजूंनी प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच मतदान ते निवडणूक निकालापर्यत केला गेला. त्यामुळे सहाव्या जागेसाठी कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली. या निवडणुक प्रक्रियेत अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार यांची मते निर्णायक होती . अपक्षांना दुहेरी बाजूंनी चुचकारले गेले . सदर आमदार शिवसेना आणि भाजपासाठी बांधील नाहीत व नसतात. हे माहीत असूनही त्यांना कधी सत्ताधारी विरोधी समजून घेत नाहीत. निवडणूक आली की, गोजारविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे आजवरच्या अनुभवावरून निवडणूकीत अपक्ष आमदार, छोट्या पक्षांनी प्रत्येक वेळी आपलीं सोय पाहून मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळात केंद्रात भाजप सरकार भक्कम पायावर उभे आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना आश्वासने दिली जातात. हे सर्वश्रुत आहे . मग त्या त्या परिस्थितीत आमदार मतदार करून आपली सोय पाहतात . त्याहीपेक्षा अपक्ष आमदारांना अशा निवडणुकीतून सत्ताधाऱ्यांना जागा दाखविण्याची सुवर्ण संधी चालून आलेली असते.राजकारणात कोणतीच बाब गुहीत धरून चालत नाही.हेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेच्या निकालानंतर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये मतदान ते मतमोजणी यातील शुक्रवार , शनिवार दोन्ही बाजूंनी आक्षेप घेण्यात आल्याने मतमोजणी प्रकिया लांबली यात काय ह़ोऊ शकते याचा अभ्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहित होता. त्यातच फडणवीस यांनी आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मतदानासाठी आणून ती मतें आपल्या उमेदवाराला मिळतील याची सुध्दा सोय करून प्रत्येक मत आमच्यासाठी कसे महत्त्वाचे आहे ते दाखवून देण्यात फडणवीस यशस्वी झाले. प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील असेल तरी व्यहूरचना फडणवीसांची असते हे पुन्हा एकदा केंद्रिय स्तरावरील नेतृत्वाला दाखवून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांनी चमत्कार घडविला असे म्हटलं आहे . अर्थात आता या पराभवानंतर महाविकास आघाडीने २० जूनला होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापासूनच मोट बांधण्याचे प्रयत्न करावेत अन्यथा सदाभाऊ खोत आमदार म्हणून सभागृहात दिल्यास वाईट वाटून घेऊ नका! शेवटी दगाफटका यावर या निवडणुका पार पडतात. असाच आजवरचा अनुभव आहे. म्हणून ज्या ज्याच्या हाती ससा तो पारधी या म्हणीप्रमाणे अति आत्मविश्वास घातक ठरतो . हे महाविकास आघाडीने लक्षात घेणे गरजेचे आहे . यापुढे कोण कुठे चुकले यापेक्षा आपण कुठे कमी पडलो यावरच पुढील सर्वं निवडणूका जिंकायच्या यासाठी महा्विकास आघाडीला अभ्यासून पुढे जावे लागले. अन्यथा अशा पराभवाचे धक्के बसत राहतील .

*प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव*
📞9372089314

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 11 =