You are currently viewing प्रेम उठाव नवीन पुस्तकाचे स्वागत

प्रेम उठाव नवीन पुस्तकाचे स्वागत

आंबेडकरी विचार हिच नवनाथ रणखांबेंच्या प्रेम उठावाची प्रेरणा – प्रा.दामोदर मोरे

ठाणे प्रतिनिधी

अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार ही कवितेची उर्जा असते आणि आंबेडकरी विचार हीच नवनाथ रणखांबे यांच्या कवितेची प्रेरणा आहे. म्हणूनच आंबेडकरी विचारांचा झेंडा रणखांबे यांच्या ‘ प्रेम उठाव ‘ मधून फडकत असताना दिसतो.’ असे यावेळी हिंदी मराठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी बोलताना सांगितले.


पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे होते . प्रेम उठाव या पुस्तकात नवीन भाषाशैली आहे म्हणून हे पुस्तक आपल वाटत . प्रेम हा जगाचा पाया आहे. सर्व गोष्टींच्या मुळाशी प्रेम आहे. कवितेचे रसायन हे खूप अप्रतिम आहे. कविता ही जाणिव पूर्वक आणि विचाराने लिहिली जाते. असे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रा. विठ्ठल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
नवनाथ रणखांबे हे माझे बंधू आहेत आणि त्यांनी लिखाणातून रणखांबे घराण्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलेले आहे याचा मला अभिमान आहे. त्याची वाटचाल अशीच पुढे चालत राहो. समाजसेवा करीत राहो. असे बोलतांना डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्था समूहाचे संचालक ,जेष्ठ समाजसेवक, अखिल भारतीय दंत परिषदेचे माजी महाराष्ट्राचे प्रतिनिधी
डॉ. श्रीकांत रणखांबे म्हणाले .


प्रेम उठाव हा काव्यसंग्रह नवलेखकाना प्रेरणा देईल असा साकार झालेला आहे. प्रेम उठाव हा विविधांगी प्रेम अविष्कराने नटलेला आहे त्यामुळे त्याने अनेकविध भावविश्व साकारले आहेत. मुळात प्रेम उठावाची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे तो पदोपदी क्रांती , परिवर्तन, समता आणि शांती चा संदेश देतो व प्रेमाने जग जिंकण्याची भाषा करतो त्यामुळे प्रेम उठाव हा साहित्यिक, लेखक, कवी नवनाथ रणखांबे यांची “जीवन संघर्षकार” म्हणून असलेली ओळख “प्रेम उठावकार” अशी निर्माण करून देऊन एक ऐतिहासिक उंची गाठल्याशिवाय राहणार नाही इतका हा काव्यसंग्रह नाविण्याने साकार झालेला आहे. वाचक वर्ग आणि साहित्य जगत त्याचे प्रेमाने स्वागत करतील. असे प्रमुख वक्ते डॉ. शहाजी कांबळे यांनी या प्रसंगी बोलताना आपले मत व्यक्त केले .

कवी कट्टा कल्याण मुंबई आणि शारदा प्रकाशन ठाणे आयोजित ‘जीवन संघर्ष’ कार नवनाथ रणखांबे यांच्या ‘ प्रेम उठाव’ या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रा. दामोदर मोरे यांच्या हस्ते झाले आणि प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेष प्रमुख उपस्थिती डॉ. श्रीकांत रणखांबे यांच्या उपस्थितीत नुकताच सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह पहिला मजला , आनंद बुद्ध विहार , आनंद वाडी कल्याण पूर्व येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत प्रा. डॉ. शहाजी कांबळे, साहित्यिक जगदेव भटू आणि समाजसेविका प्रतीक्षा थोरात होते तर या प्रसंगी प्रमुख गटशिक्षणाधिकारी देवगड उपस्थिती प्रजापती थोरात, गटशिक्षणाधिकारी मुरबाड संजय थोरात , प्रसिद्ध चित्रकार सतीश खोत , अध्यक्ष रमाई प्रतिष्ठान नाना नेटावटे आदी उपस्थित होते.
कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई यांच्या तर्फे समाजसेवा , उत्कृष्ट पत्रकार , साहित्य सेवा, जीवन गौरव पुरस्कार 2021 – 2022 ने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. शब्दांगण साहित्य प्रतिष्ठान, गर्जा कलमंच, मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम यांना ही सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. दामोदर मोरे, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे , डॉ. श्रीकांत रणखांबे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, मिलिंद जाधव यांना उत्कृष्ठ पत्रकारिता परस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रणखांबे यांनी केले. पुस्तक प्रकाशनाचे सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संघरत्न घनघाव, सुरेखा गायकवाड यांनी तर आभार कवी अनिल शिंदे यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =