You are currently viewing काळा … काळा …काळा …?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

काळा … काळा …काळा …?

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

काळा … काळा …काळा …?
(बोलतांना .. जरा विचार करा )

अब्राहम लिंकन …. अमेरिकेचे माजी अध्यक्ष…लहानपणी
लिंकन लाकूड तोडत असत. अत्यंत बिकट परिस्थितीत
लिंकन वकिल झाले व रोज कोर्टात पायी जाऊन वकिली
करू लागले.एकदा असेच पायी जात असतांना एका बैलगाडीवाल्याला
विनंती करून गाडीत बसले. गप्पा सुरू झाल्या. लिंकन म्हणाले, माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे.गप्पा रंगात
आलेल्या असतांना रस्त्यात अचानक एका डबक्यात चिखलामध्ये एक डुकराचे पिलू लिंकन यांना दिसले. काही
केल्या त्या पिलाला चिखलातून बाहेर पडता येत नव्हते ,लिंकन यांनी ते पाहिले व ते
गाडीतून खाली उतरले आणि अलगद त्या पिलाला बाहेर काढले.

 

तेव्हा ते पिलू तुरू तुरू धावत सुटले. लिंकनने हात झटकले
व गाडीत येऊन बसले. तेव्हा गाडीवान म्हणाला, तुम्ही म्हणता
माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे, आता मला सांगा,ह्या
डुकराच्या पिलाला बाहेर काढण्यात तुमचा कोणता स्वार्थ होता?

ऐका मंडळी,
लिंकनचे उत्तर ऐका ….

लिंकन म्हणाले .. हो हो .. नक्कीच माझा स्वार्थ आहे .अहो,
हे पिलू जर मी आज चिखलातून बाहेर काढले नसते तर … “ आज रात्री मला झोप आली नसती , खरंच ..
झोप आली नसती “बघा.. त्या डुकराच्या पिलाला काढले नसते तर झोप आली नसती” याला म्हणतात माणूस आणि
माणसातील माणुसकी .. कुठे लिंकन नि कुठे आपण …?
लिंकन अत्यंत विनोदी होते .ते म्हणत, माझ्या इतका कुरूप
माणूस जगात दुसरा कोणी नाही .

 

मंडळी , ही लिंकनची कथा मी का सांगितली तुम्हाला .?
अहो, “ज्याचे मन सुंदर … तो जगातला सर्वात सुंदर माणुस
असतो. लिंकन काळा सावळा होता.. पण लिंकन इतका
दयाळू माणुस शोधून सापडणे अवघड आहे.रंग कसा आहे
पेक्षा माणुस कसा आहे ? त्यात माणुसकी आहे का … हे बघा.
लिंकन खूप वेळा अध्यक्षपदाची निवडणूक हरले पण त्यांनी
चिकाटी सोडली नाही व शेवटी ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले.
आणि ऐतिहासिक ठरावा असा मोठा गुलामगिरीचा प्रश्न त्यांनी त्यांनी कायमचा सोडवला जो सोडवणे अत्यंत अवघड
होते . शिवाय त्या काळात उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका
यात यादवी युद्ध पेटले होते.. तो गंभीर प्रश्न ही लिंकन यांनी
सोडविला.जो अत्यंत जटील होता.

 

माणुस कर्तृत्वाने महान हवा.. रंग गोरा की काळा हा प्रश्न
फारच गौण आहे.कर्तृत्वाने माणसाचे जीवन उजळते…
रंगाने नव्हे.म्हणून माणसातले गुण पहा …त्याचा रंग पाहू नका.
एखादी व्यक्ती खूप गोरी असेल पण कर्तृत्वशून्य असेल तर…
तिची शिसारीच येते ….

 

सर मार्टिन ल्यूथर किंग हे दुसरे उदाहरण कर्तृत्वाचे घेता येईल.
ही माणसे कर्तृत्वाने अमर झाली आहेत.काळ ही त्यांना कधीच
पुसू शकणार नाही…”यावत्चंद्रदिवाकर “ ते ह्या पृथ्वीवर राहतील या बद्दल मुळीच कुणाच्या मनात संदेह नसावा हे नक्की….! सर मार्टिन ल्यूथर किंग १९५९ साली जेव्हा भारतात
आले, त्या आधी किती तरी वर्षे त्यांचे भारत भेटीचे स्वप्न होते
, ते फळाला आले. ते म्हणत , भारताचा आत्मा वाचवण्यात
जर यशस्वी ठरलो तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल.
भारता विषयी व गांधीजींविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा व
आदर होता.भारतातील भेदभाव व अस्पृश्यता निवारणाकडे
त्यांचे लक्ष होते व तसेच काम त्यांना अमेरिकेत करायचे होते.
अमेरिकेत गोरे व काळे यांच्यासाठी वेगवेगळे सीट राखीव
असत. एक दिवस एक काळी महिला गोऱ्यांच्या सीटवर
बसली असता आक्षेप घेण्यात आला पण ती काळी महिला
जागेवरून उठली नाही.

 

इथून मग अमेरिकेत या विषमते विरूद्ध आंदोलन सुरू झाले.
प्रकरण कोर्टात गेले नि न्यायालयाने भेदभावावर चांगलेच
ताशेरे ओढले. जवळ जवळ एक महिना सर मार्टिन ल्यूथर
किंग भारतात राहिले. पायी चालत ते फिरत असत . फूट
पाथवर राहणारे व दुसरीकडे अलिशान महालात राहणारे
लोक पाहून त्यांना भयंकर वाईट वाटत असे. या महिना
भराच्या काळात त्यांनी भारतात खूप सभा घेतल्या. त्यांच्या
सभांना प्रचंड गर्दी होत असे.गांधीजींचा भारत त्यांना जवळून
पहायचा होता, अभ्यासायचा होता. गांधीजीं विषयी त्यांना
प्रचंड आकर्षण होते. एक महिना राहून परत गेल्यानंतर
आपल्या मायदेशी काळा गोरा भेदा विरूद्ध त्यांनी काम केले.
या काळ्या रंगासाठी नेत्यांना खूप झगडावे लागले.सहजा
सहजी निकालात निघणारा हा प्रश्न नव्हता. अजुनही देशोदेशी
त्याचे चटके बसत आहेत. कधी उघडपणे कधी गुप्त पणे…

 

तिसरे उदा. नेल्सन मंडेला यांचे.यांची कथा तर जगजाहीर आहे.वर्ण द्वेषात होरपळलेल्या आपल्या बांधवांना न्याय मिळावा म्हणून ह्या माणसाने आपले उभे आयुष्य पणाला लावले व जवानी तुरूंगात काढली.मंडेला यांनाही ह्याच कारणा
साठी लढा द्यावा लागला.नेल्सन मंडेला हे दक्षिण अफ्रिकेचे
पहिले कृष्णवर्णिय अध्यक्ष झाले. ते वर्ण द्वेष व वर्ण भेद मोहिमेतील आदर्श व्यक्तिमत्व होते. वर्ण द्वेषा विरूद्ध लढा
दिल्यामुळे विरोधकांनी त्यांना तुरूंगात टाकले. तब्बल २७
वर्षे त्यांनी तुरूंगात काढली पण ते अजिबात डगमगले नाहीत .

 

ते तुरूंगातून बाहेर आले तेव्हा जवानी संपून वार्धक्य सुरू
झाले होते.पण तरी ही त्यांनी आपले काम थांबवले नाही.
आपल्या काळ्या बांधवांवर होणाऱ्या अन्याया विरूद्ध ते
काम करतच राहिले.. अविश्रांत … अविरत …

आणि आता आपले खाशाबा जाधव… विसरलो आपण त्यांना? कधीच विसरणार नाही …
आपले बाबा आमटे, प्रकाश आमटे , विकास आमटे
साधना ताई … गोरे होते का हे … नाही … ते कार्यांने गोरे
होते, आहेत … जगभर त्यांचे नाव दुमदुमते आहे त्याच्या
कर्तृत्वा मुळे …कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी जी
वसाहत उभारली व रोग्यांची जी सेवा केली त्याला इतिहासात
तोड नाही.आपले संपूर्ण जीवन बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी खर्ची
घातले. उजाड अशा माळरानावर रोग्यांसाठी नंदनवन उभारले
व समाजातील अत्यंत उपेक्षित अशा या घटकासाठी हक्काचे
घर मिळवून दिले. अशी ही सर्व माणसे कृष्णवर्णिय आहेत.
आज ही ह्या उपेक्षित बांधवांसाठी डॅा.प्रकाश आमटे,डॅा.विकास आमटे,व त्यांचे कुटुंबिय अविश्रांत काम
करित आहेत.समजाच्या नजरेतून उतरलेल्या व समाजाने
दूर लोटलेल्या या बांधवांसाठी आमटे कुटुंबियांनी आपले
सर्वस्व व आपले जीवन पणाला लावलेले दिसते आहे अशी
ही आमटे मंडळी ही कृष्णवर्णियच आहेत .त्यांच्या कार्याला
उपमाच नाही एवढे श्रेष्ठ त्यांचे कार्य आहे.

 

 

अहो .. क्रिकेटियर रिचर्डस … आहे तोड त्याला..?रिचर्डस
जेव्हा मैदानावर फटकेबाजी करत असे तेव्हा अख्खे जग
वेडावत असे.केवढा लोकप्रिय होता तो.. लोक काय कातडीवर
प्रेम करतात ? अजिबात नाही लोक गुणांवर प्रेम करतात.जसे
अझरुद्दिनवर ही लोकांनी भरभरून प्रेम केले .अझरूद्दिननेही
आपला एक जमाना गाजवलाच..! त्याची लोकप्रियताही काही
कमी नव्हती .त्या आधी सुनिल गावस्कर यांनी अनेक जागतिक रेकॅार्डस नोंदवले.व क्रिकेट विश्वात आपली स्वत:ची
एक जागा निर्माण केली.काही मानदंड प्रस्थापित केले.असे हे
आपले गावस्कर ही सावळेच आहेत.त्या नंतर आला सर्व रेकॅार्ड मोडीत काढणारा सचिन तेंडुलकर …आला नि क्रिकेट विश्वात अढळ तारा बनून राहिला , तोही गहू वर्णिच आहे.ही सगळी
सावळी मंडळी ,कृष्णवर्णिय आहेत पण झगझगीत प्रकाश पडतोय त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण….
जगात ..!
माणसाने कर्तृत्वाने चमकावे… रंगाने नव्हे … कार्याने अमर व्हावे .. रंगाने नाही … रंगाने कोणीच अमर होत नाही… कार्य
कर्तृत्वानेच होतात . मग आपण रंगाला किती महत्व द्यायचे
ते ठरवा …

 

कृष्ण काळा राम काळा सावळी ती रूख्मिणी
जग सारे भाळले हो,कर्तृत्वाने ते गुणी…
सावळ्यांचा देश आहे, पराक्रमी ते थोर हो
भुलू नका वरलिया रंगा,संत सांगती थोर हो …

प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १३ फेब्रुवारी २०२२
वेळ : रात्री ९ : ०३

प्रतिक्रिया व्यक्त करा