You are currently viewing सर्व आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या – खासदार उदयनराजे भोसले 

सर्व आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या – खासदार उदयनराजे भोसले 

सातारा

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मत व्यक्त केले.

मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

याआधीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र असं झालं नाही, असंही उदयनराजे म्हणाले. पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यासह काही नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी आरक्षण प्रश्नावर त्यांनी चर्चा केली.

‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा’ असं उदयनराजे म्हणाले.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती. ‘या जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे’ असं विनायक मेटेंनी म्हणाले होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर 1857 प्रमाणे क्रांती होईल आणि लोक नेत्यांना मारुन टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 7 =