You are currently viewing विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी NCERT राबविणार नवी योजना

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी NCERT राबविणार नवी योजना

विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतरच्या शिक्षणात आलेल्या व्यत्ययांमुळे वाढला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) विद्यार्थ्यांचा हा संघर्ष कमी करण्यासाठी तसेच सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके करण्याचे ठरवले आहे.

मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच नवे शैक्षणिक वर्ष 2022 सुरु होण्याआधी ही नवी अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे NCERT ने सांगितले आहे.

NCERTने सततच्या शैक्षणिक व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर, पुढील वर्षासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सर्व टप्प्यांवर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. अंतर्गत आणि बाह्य तज्ज्ञांचा समावेश असलेले विभाग मंगळवारी तर्कसंगत अभ्यासक्रम सादर करणार आहेत, ज्याच्या आधारे नवीन पाठ्यपुस्तकांची रचना केली जाणार आहे.

NCERT संचालक श्रीधर श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यानंतर, सर्व सामग्री विभागांनी तर्कसंगत करण्यासाठी प्रस्तावित अभ्यासक्रमाचे विश्लेषण अभ्यासक्रम आणि विकास विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संचालकांनी असेही नमूद केले की 1 जानेवारी 2022 पर्यंत, प्रस्तावित बदलांसह पाठ्यपुस्तके पुन:र्मुद्रणासाठी प्रकाशन विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने देखील घेतला आहे. इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम 2022-2023 शैक्षणिक वर्षापासून एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय – इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा