You are currently viewing भ्रष्टाचाराच्या अनुभवामुळेच कणकवली वासियांनी संदेश पारकरांना नाकारले

भ्रष्टाचाराच्या अनुभवामुळेच कणकवली वासियांनी संदेश पारकरांना नाकारले

कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे प्रत्युत्तर

ज्यानी आपली राजकीय ह्यात भ्रष्टाचार व गैरव्यवहारांमध्ये घातली व ज्यांना भ्रष्टाचाराचा पुरेपुर अनुभव आहे अशा संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायत वर भ्रष्टाचाराचे आरोप करावे हे हास्यास्पद आहे. श्री. पारकर यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच 2008 पासून आतापर्यत केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील जनतेने आमच्याकडे नगरपंचायत ची सत्ता दिली. त्यानंतर श्री. पारकर यांचा शहरातील आलेख जनतेनेच खाली आणला. कणकवली नगरपंचायत निवडणुकी मध्ये केलेल्या मानहानीकारक पराभवाला तीन वर्षे झाली तरी संदेश परकर हा पराभव अजून विसरत नाहीत. शिवसेनेच्या काही जागा मागील नगरपंचायत निवडणुकीत काही मतांनी पडल्या असे सांगणाऱ्या पारकर यांना कदाचित त्या निवडणुकीवेळी ते भाजपमध्ये होते याचा विसर पडला. कारण श्री. पारकर प्रत्येक निवडणुकीत कुठल्या पक्षात असतात ते त्यांना आता कदाचित आठवत नसावे. कणकवली शहरातील जनतेशी पारकर यांचा संपर्क तुटल्याने त्यांना अशा प्रकारचे संपर्क अभियान राबविण्याची वेळ आली आहे. निर्धार करायचाच असेल तर बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक दहा पक्ष फिरून आलेल्या पारकर यांचे ऐकून निर्धार कसे करतील. नाकारलेल्या व पक्षात कोणतेही स्थान न उरलेल्या स्वयं घोषित 53 वर्षीय युवा नेता नगरपंचायत वर हे आरोप नैराश्यातून करत आहे. शहरवासीयांच्या बाबतीत कळवळा असल्याचे दाखविणाऱ्या पारकर यांनी गेली दोन वर्षे कोरोना काळ असून देखील आपले वाढदिवस गर्दीत साजरे करून शहरात तील जनतेचे आरोग्य धोक्यात घातले. श्री. पारकर यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क लावा असे आवाहन करीत असताना त्यांचे देखील आवाहन पारकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला धुडकावून लावले. भ्रष्टाचाराबाबत बोलणाऱ्या पारकर यांच्या सोबत असणारे दोन नगरसेवक व शिवसेनेचे तीन नगरसेवक व पारकर यांचे एक भाऊ मात्र नगरपंचायत च्या भ्रष्टाचाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत. त्यावरूनच पारकर यांचे आरोप शहरातील जनता ओळखून आहे. व अशा खोट्या आरोपामुळेच पारकर यांच्यावर घरी बसण्याची वेळ जनतेने आणली आहे. दर निवडणुकीपूर्वी पक्ष बदल करणाऱ्या पारकर यांच्या वर त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचा देखील विश्वास राहिला नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढच्या वाढदिवसा पूर्वी दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊ नको मी तिथे मात्र वाढदिवसाला येणार नाही असे जाहीर वक्तव्य केले. व त्यामुळे शिवसेनेत जाऊन वर्ष उलटून गेले तरी पारकर यांना पक्ष कुठलेच पद पण देत नाही. कारण ते पुढच्या निवडणुकीपर्यंत कुठल्या पक्षात असतील याची कुणालाच शाश्वती नाही. संदेश पारकर हे कणकवली शहराला लागलेले ग्रहण होते. आणि शहराचा विकास झपाट्याने होण्यासाठी जनतेने ग्रहण 2008 मध्ये सोडवले. पारकर यांच्या सोबत असलेले दोन नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षीय दृष्ट्या पाहिल्यास पारकर यांचे शहरातील अस्तित्व देखील शून्यावर येऊन थांबले आहे.

नगरपंचायतची पुढील निवडणूक ही थेट नगराध्यक्ष निवडीची नसल्यामुळे पारकर यांनी आत्ताच शहरातील कोणता तो वॉर्ड ठरवावा. आणि कामाला लागावे. जेणेकरून त्यांना निदान नगरसेवक पदाची निवडणूक तरी लढवता येईल. व त्यामुळे त्यांच्या भावा च्या नशिबी आलेली वेळ तरी त्यांच्यावर येणार नाही. 2003 ते 2008 पर्यत एकहाती कणकवली नगरपंचायत ची सत्ता पारकर यांच्याकडे कणकवलीकरांनी दिली होती. त्या सत्तेच्या कार्यकाळात पारकर यांनी भ्रष्टाचाराचे किती दिवे लावले? व काय काय दिवे लावले? हे कणकवलीकरांनी जाणल्यामुळे 2008 पासून आतापर्यंत सातत्याने तीन वेळा नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्याकडे सत्ता दिली. कणकवली नगरपंचायत च्या सत्तेवर कोणाला बसवायचं आणि कुणाला खाली उतरवायचं हे कणकवलीकर पूर्णपणे जाणून आहेत. व तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. भविष्यात आमच्याकडूनही काही चुका झाल्यास आम्हाला सत्तेवर बसवणारे कणकवलीकर आम्हाला खाली उतरवू शकतात याची आम्हाला जाणीव आहे. आमच्याकडून जर अनावधानाने काही चुका झाल्या तर आमचे कणकवलीकर आम्हाला सत्तेतून खाली उतरवू शकतात. पण त्याच वेळी पर्याय म्हणून कणकवलीकर पारकर यांना कदापिही स्वीकारणार नाही. हे पारकर यांनी लक्षात ठेवावे. पारकर यांची काही उरली – सुरली ताकद असेल तर त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी लावावी. राज्यात सत्ता त्यांच्याच पक्षाची आहे. त्यामुळे पारकर यांना पण कळेल की त्यांची सत्तेत व पक्षात काय पात्रता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =