You are currently viewing अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची बदली

अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची बदली

त्यांना कार्यमुक्त करु नका तानाजी कांबळे; पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची भेट घेणार…

वैभववाडी :

अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीररित्या केलेली घळ भरणी, पुनर्वसन न करता प्रकल्पग्रस्तांची धरणाच्या पाण्यात बुडवलेली १३० घरे, प्रकल्पात झालेला गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेली याचिका हे एकुणच प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्याने चौकशीच्या फे-यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी आपली बदली सांगली येथे करुन घेतली असून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अरुणा प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावणा-या कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना कार्यमुक्त करु नये त्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन खात्यातून निलंबित करण्यात यावे अशी मागणी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केली आहे.

अरुणा प्रकल्पाची घळभरणी सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ कायद्यातील कलम ६ व १० (३) नुसार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांच्यावर ठेवण्यात आली आहे.मात्र प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी वरील कायद्याने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडले नाही. आणि कायद्याचे बेजबाबदार पणे व हयगयीने उल्लंघन करुन या प्रकल्पाची
घळभरणी केली आणि पाणीसाठा करुन १३० घरे धरणाच्या पाण्याखाली बुडवली आहेत. प्रकल्पावर आणि पुनर्वसनावर अमाप पैसा खर्च केलेला असुन अरुणा प्रकल्पग्रस्त २०१३ च्या नव्या भूसंपादन कायदा प्रमाणे चौपट नुकसान
भरपाईस पात्र असतांना १९९४ च्या भूसंपादन कायदा व प्रमाणे तुटपुंजी नुकसान भरपाई दिलेली आहे. त्यातही या मोबदला वाटपात मोठा पक्षपात करण्यात आला आहे.असा आरोप लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे पदाधिकारी तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, विलास कदम, वसंत नागप, सुर्यकांत नागप, अशोक नागप, अशोक बांद्रे, राजेंद्र नागप, रामचंद्र नागप, मनोहर तळेकर, रमेश नागप, सुचिता चव्हाण, सुनंदा जाधव, आरती कांबळे यांनी केला आहे.

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वरीष्ठ पातळीवर या बाबत लक्षवेधी तक्रारी करण्यात आल्या असून लाँकडाऊन मुळे गेले सहा महिने गप्प बसलेले अरुणा प्रकल्पग्रस्त आता आक्रमक होताना दिसत आहेत. प्रकल्प ग्रस्तांच्या चौकशीच्या फेऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगली जिल्ह्यात बदलीकरुन घेतली असून सद्या अरुणा प्रकल्पाचा प्रभारी कार्यभार त्यांनाच सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. अधिक्षक अभियंता मिलिंद नाईक आणि मुख्य अभियंता तिरमनवार यांनी कोणत्या आधारावर आणि निकषांवर कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्या बदलीची शिफारस केली. आणि सांगलीवरुन ते प्रभारी कामकाज कसे काय पाहू शकतात. असा सवाल तानाजी कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची येत्या चार दिवसात भेट घेवून अरुणा प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावणा-या कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यावर कठोर कारवाई करुन निलंबीत करण्यात यावे व त्यांना कोणत्याही परिस्थितीत कार्यमुक्त करु नये अशी मागणी आपण करणार पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के मंजुलक्षमी यांना भेटून करणार असल्याचे तानाजी कांबळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =