You are currently viewing जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेताहेत… परशुराम उपरकर

जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेताहेत… परशुराम उपरकर

वैद्यकीय स्टाफ, औषधे उपलब्ध न झाल्यास आंदोलन…

कणकवली

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असताना पालकमंत्री केवळ जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घेत आहेत अशी टीका मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज केली. तसेच शासकीय रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा, स्टाफ, औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा मनसे आपल्या परीने याची दखल घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर माजलेला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनावर आता काही प्रमाणात नियंत्रण आणलं गेलं असलं, तरी अजूनही रुग्णांना अनेक समस्या भेडसावत आहेत. रुग्णांना जेवण देणाऱ्या महिलेला प्रति ८५ रुपयाने काँट्रॅक्ट दिले गेले. परंतु कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर १७५ रुपये आहे. त्यामुळे या कमी पैशात राबवून घेण्याच्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि या स्थानिक बचत गटांना जेवणाचं काम देवून त्यांना प्रति ताट १७५ रुपये प्रमाणे काम मिळावं, जेणेकरून त्या उत्तम, सकस आणि पौष्टिक जेवण देवू शकतील अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील मुदत संपत आलेली औषधं काळाबाजार करून बाहेर विकली जातात. यामागे काही रुग्णालयाशी संबंधित माणसांचा हात आहे. या प्रकरणाविषयी सविस्तर चौकशी व्हावी, अशी मनसेने आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. तसेच पी. एम. केअर फडातून मिळालेले व्हेंटिलेटर हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे अनेक पेशंट दगावले आहेत. जिल्ह्यात आलेल्या फिजिशियननी देखील याविषयी दबक्या आवाजात चर्चा केली होती. परंतु आमदार, खासदार गेल्यानंतर त्यांनी आपली भाषा बदलली आणि सर्व सुस्थितीत असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ कुठेतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे या व्हेंटिलेटरमध्ये काय दोष आहे आणि आरोग्य व्यवस्था कुठे कमी पडतेय, याविषयी चौकशी करण्याची मनसे आरोग्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असेही उपरकर म्हणाले.

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असताना पालकमंत्री केवळ जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घेऊन आपल्यामुळे काम झाल्याचं श्रेय घेत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या दुर्दशेकडे लक्ष देवून त्यांनी जिल्ह्यासाठी एक चांगला सिव्हील सर्जन आणण्याची आवश्यकता आहे. डॉ. नागेश पवार यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा आणण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला पाहिजे होता. परंतु तोही त्यांनी केला नाही. त्यामुळे राज्यकर्ते, पालकमंत्री फक्त प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी झटत आहेत.
जिल्ह्यासाठी फिजिशियन उपलब्ध झालेत. परंतु त्यांना याआधीच आणण्याची गरज होती. परंतु मृत्यूचा आकडा हजारीपार करण्याची हे लोकप्रतिनिधी वाट पाहत होते काय? असा सवालही श्री.उपरकर यांनी उपस्थित केला आहे. मनसे या र्साया विषयांवर सातत्याने जनतेची बाजू मांडत आली आहे. बाकी पक्षाचे लोकप्रतिनिधी फक्त कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष उभारणी करून जातात. परंतु त्यांनी पेशंटला योग्य उपचार मिळवून देण्याकडेही लक्ष द्यायला हवे. गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी नियमांचं पालन करतील, याकडेही योग्य ते लक्ष प्रशासनाने पुरवायला हवं. तसंच त्यांची गावात येण्यापासून अडवणूक करू नये, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.ं

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 5 =