You are currently viewing ..…..पोपटराव ऊवाच!

..…..पोपटराव ऊवाच!

रेड झोन मध्ये गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी घडवून आणली जिल्ह्यातील सरपंच आणि पोपटराव पवार यांची चर्चा!

सिंधुदुर्ग जिल्हाने कोरोनावर मात करत भीतीच्या छायेतून बाहेर यावे आणि जिल्हा रेड झोनमधून पुन्हा ग्रीन झोनमध्ये यावा यासाठी भाजपा नेते आमदार श्री नितेश राणे यांनी विविध प्रयोग सातत्यपूर्वक चालू ठेवले आहेत. ठरवून केवळ पंधरा दिवसात धोक्याच्या पातळीकडे झुकलेल्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीला तिथले सरपंच पोपटराव पवार यांनी धोक्यातून बाहेर काढत कोरोनामुक्त करून दाखवले. त्यांच्या यशस्वी प्रयोगाची चर्चा राज्यभर झाली. जिल्ह्यातील सरपंचाना हिवरे बाजार सरपंच पोपटराव पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभावे यासाठी आमदार नितेश राणे यांनी झुम मिटिंग आयोजित करत एकत्रित चर्चा घडवून आणली.

हिवरे बाजार हे गावसुद्धा इतर अनेक गावांप्रमाणे कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. परंतु सरपंच पोपटराव पवार यांनी वेळीच गावच्या मुख्य कोरोना समितीतर्फे विविध पाच पथके तयार करून सर्व्हेक्षण ते लसीकरणपर्यन्त जबाबदारीचे वाटप केले. अतिशय कठोरपणे गावचे कोरोनानिर्मूलन अभियान चालवले. नियम आणि निर्बंध इतक्या कडकपणे राबवले की गावात लॉकडाऊन करण्याची वेळ आली नाही. किराणा दुकान, रेशन दुकान, ग्रामपंचायत ते विकास संस्थांपर्यंत सगळे व्यवहार चालू ठेवूनही कोरोनावर विजय कसा मिळवला याचे सुंदर विवेचन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्गातील चाकरमानी आणि गाव यांच्यातील निर्माण झालेल्या कटुतेवरही प्रभावी भाष्य करत, ही मंडळी देखील आपली आहेत, पण नेमक्या कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक होते याचा अनुभव आपल्या गावातील अनेक उदाहरणासह विशद केला. गावातल्या उपलब्ध पर्यायांचा वापर करत बाहेरगावातून आलेले कामगार यांचे कसे नियोजन करत गावातील शेती, दूध,अर्थव्यवहार सुरळीत ठेवता येतील हे त्यांनी स्वानुभवातून पटवून दिले.

यावेळी महिला सरपंचांसह अनेकांनी विचारलेल्या अडचणींवर त्यांनी समर्पक उपाययोजना सुचवत सुंदर मार्गदर्शन केले. आमदार नितेश राणे यांचे पोपटराव पवार यांनी याप्रसंगी कौतुक करताना म्हंटले आहे की आपल्या जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी संपूर्ण राज्यात एखाद्या जिल्ह्याने पुढाकार घ्यावा, अशी ही पहिलीच घटना आहे. संकटाच्या काळात आपल्या लोकांच्या मनातली भीती दूर करून, त्यांचा आत्मविश्वास जागवत त्यांना या संकटातून कसे बाहेर काढता येईल हे पाहणे आदर्श राज्यकर्त्यांचे काम असते. आणि असा प्रयत्न केल्याबद्दल मी आमदार नितेश राणे यांचे कौतुक करतो. भविष्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रभाई तोमर यांच्याशी अजूनही काही विषयांसाठी चर्चा करणार असून यावेळी आमदार नितेश राणे हेदेखील सोबत असतील. दुसरी लाट धोकादायक असली तरीही अशा प्रयत्नांतून त्यावर मात करण्याची जिद्द आणि सातत्य बाळगणाऱ्या आमदार नितेश राणे यांचे या चर्चासत्राच्या निमित्ताने पोपटराव पवार यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − 3 =