*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये सर्प जागरूकता व विचारमंथन सत्र दिमाखात संपन्न :*
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, सर्पांबाबतचे गैरसमज व भीती दूर करणे तसेच सर्पांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून देणे या उद्देशाने ‘सर्प जागरूकता व विचारमंथन सत्र’ आयोजित करण्यात आले.
या उपक्रमासाठी वनविभाग, सावंतवाडीच्या जलद कृती दल (Rapid Response Team – RRT) रेस्क्यू टीमला विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. वनरक्षक व प्राणीमित्र श्री. साईप्रसाद भिसे, RRT प्रमुख श्री. रामचंद्र रेडकर तसेच रेस्क्यू टीममधील श्री. देवेंद्र परब, श्री. पुंडलिक राऊळ, श्री. शुभम फाटक, श्री. गोपाळ सावंत, श्री. शुभम कळसुलकर आणि श्री. बाळकृष्ण गावडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी १५ ऑगस्ट २०२६ रोजी हरित सेना विभागांतर्गत आयोजित स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून सन्मान करण्यात आला.
प्राणीमित्र श्री. साईप्रसाद भिसे यांनी विद्यार्थ्यांना सर्पांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, वैशिष्ट्ये आणि पर्यावरणातील महत्त्व याबाबत शास्त्रीय माहिती दिली. सर्प हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
RRT प्रमुख श्री. रामचंद्र रेडकर यांनी सर्प आढळल्यास घ्यावयाची काळजी, सर्पांना त्रास न देणे, सुरक्षित अंतर राखणे आणि स्वतःहून सर्प पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित रेस्क्यू टीमची मदत घेणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रेस्क्यू कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्यांचा योग्य व सुरक्षित वापर कसा केला जातो, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथन व प्रश्नोत्तर सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सर्पांचे वर्तन, सर्पसंरक्षण, मानव-सर्प सहअस्तित्व, सर्पदंशापासून बचाव आणि पर्यावरण संवर्धन यांसंदर्भात विविध प्रश्न विचारले. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय मदत घेणे आणि अप्रमाणित घरगुती उपचार टाळणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
“सर्प हा शत्रू नसून निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे,” हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. सर्पसंरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
या उपक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक श्री. रुजल पाटणकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव व सहा. शिक्षिका कु. सुधा गावस यांच्या हरित सेना विभागांतर्गत नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘जागरूकतेकडून विचारमंथनाकडे आणि विचारमंथनाकडून जागृतीकडे’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे सत्र विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणीय संवेदनशीलता, सुरक्षिततेची जाणीव आणि वन्यजीवांविषयी आदर निर्माण करणारे प्रभावी शैक्षणिक उपक्रम ठरले.
