कणकवलीतील १९ विकास संस्थांचा १०० टक्के कर्जवसुलीबद्दल गौरव
विकास संस्थांनी कर्जवाटपाबरोबरच व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार व उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत; जिल्हा बँकचे सर्वतोपरी सहकार्य – अध्यक्ष मनीष दळवी
कणकवली :
सहकारी संस्थांचा पाया शेतकरी असून विकास संस्थांनी केवळ कर्जवाटपावर न थांबता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्जवसुली करणे हे अत्यंत कठीण काम असून शेतकऱ्यांना समजावून सांगत त्यांना नियमित परतफेडीकडे आणणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ तुलनेने कमी मिळाला असला, तरी येथे शेतकरी नियमित कर्जफेड करणारा आहे. त्यामुळे जिल्ह्याने सहकार क्षेत्रात पारदर्शकतेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकास संस्थांना सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा बॅंक पाठीशी असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात जिल्हा बॅंकेच्यावतीने प्राथमिक विकास संस्था १०० टक्के वसुली बद्दल सत्कार कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅंक संचालक विठ्ठल देसाई, गजानन गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अंतर्गत लेखा परिक्षक के.डी.वरक, तालुका विकास अधिकारी दिगंबर गवाणकर, कणकवली शाखा व्यवस्थापक राजू घाडीगांवकर, संस्था संगणकीकरण व्ही.डी. हडकर, बॅंक अधिकारी राजू सावंत, नाना कुलकर्णी, अनिल सावंत आदींसह बॅंक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कणकवली तालुक्यातील असलदे विकास सोसायटी ही संस्था व बॅंक पातळीवर एकमेव १०० टक्के कर्ज वसुली पात्र सलग ५ व्या वर्षी ठरल्याबद्दल अध्यक्ष व सचिव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, शिवडाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, फोंडाघाट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, नाटळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, हळकुळ बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सांगवे विविध कार्यकारीने सहकारी सेवा, कासार्डे ग्रुप विकास सोसायटी, आयनल श्री नागेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा, तळेरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, वरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, कणकवली ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, कोळोशी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, हळवल श्री शेवराई रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, तिवरे – डामरे श्री अनभवानी विकास कार्यकारिणी सहकारी सोसायटी, सातरल – कासरल विकास कार्यकारणी सहकारी सोसायटी, ओसरगाव श्री लिंग माऊली विकास कार्यकारिणी सहकारी सेवा सोसायटी, कलमठ विकास सोसायटी आदी आदी १९ संस्था तालुक्यातील १०० टक्के कर्जवसुलीचा आदर्श निर्माण केला. त्याबद्दल विकास संस्थांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
बॅंक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, आपला शेतकरी प्रामाणिक आहे. जरी कर्ज माफीत आम्हाला कमी रक्कम मिळत असेल तरी विमा योजना आणि नुकसानभरपाईच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना सन्मानाने मदत मिळाली आहे. आता प्रोत्साहन अनुदानात राज्यात सिंधुदुर्ग सर्वाधिक मदत मिळवणारा जिल्हा असेल. आपण अध्यक्ष झालो तेव्हा जिल्ह्यात एकही संस्था १०० टक्के संस्था पातळीवर कर्ज वसुली करणारी नव्हती. आज जिल्ह्यात आठ संस्थांनी कर्ज वसुली केली असून त्यात कणकवली तालुक्यात असलदे ही एकमेव संस्था आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष भगवान लोके, संचालक मंडळ आणि सचिव व सभासदांचे कौतुक आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवहारात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले आहे.
सहकार कायद्यातील बदलांनुसार प्रत्येक संस्थेत स्वतंत्र सचिव नेमण्याची व्यवस्था केली जात आहे. सचिवांना दरमहा १७ हजार ५०० रुपये वेतन मिळावे यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून भविष्यात त्यांच्या कामगिरीनुसार बोनस देण्याचाही विचार आहे. संस्थांकडे स्वतःची जागा नसल्यास शासनामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याठिकाणी कार्यालय व गोदाम उभारला येणार असून काजू बोर्डाच्या गोदामांसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. नाबार्ड तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास संस्थांनी नवे व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन मनीष दळवी यांनी केले.
खारेपाटण विकास संस्थेने विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय यशस्वीपणे सुरू केले असून अशाच प्रकारे दोन-तीन संस्था एकत्र येऊनही उपक्रम राबवू शकतात. जिल्हा बँकेने सर्व प्रकारची कर्जे देण्याचा निर्णय घेतला असून “सुगी” ॲपच्या माध्यमातून कर्जप्रक्रिया अधिक जलद करण्यात येणार आहे. प्रस्ताव ऑनलाइन सादर झाल्यानंतर २४ तासांत बँकेकडून उत्तर आणि पुढील ४८ तासांत मंजुरी देण्याचे नियोजन आहे. बॅंकांप्रमाणे शेतघर, कंपाऊंड वॉल, घरदुरुस्ती तसेच इतर गरजांसाठीही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र सभासदांना संस्थेच्या शिफारशीनुसार पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सुलभ पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील २२८ विकास संस्थांमधील प्रत्येकी एका प्रतिनिधीला अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी एका वर्षात तीन हजार जनावरे उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. विकास संस्थांनी खाद्य विक्रीसह इतर पूरक व्यवसाय सुरू करावेत. शेतकऱ्यांचा विमा विकास संस्थांमार्फत काढण्यावर भर देण्यात येणार असून सहकार क्षेत्रात सेवा करण्याची भावना आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य दिले जाईल असे मनीष दळवी यांनी जाहीर केले.
जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई म्हणाले, कणकवली तालुक्यातील १९ विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचा मान मिळविला असून त्यामध्ये असलदे संस्थेची संस्था पातळीवर कर्ज वसुली करत कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. संस्थेने शंभर टक्के कर्जवसुली करून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. बॅंक म्हणून विकास संस्थांच्या पाठीशी आहोत.
प्रास्ताविकात अनिरुध्द देसाई म्हणाले, कणकवली तालुक्यात विकास संस्थांचे काम चांगले आहे. येथील विकास अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळे विकास संस्थांची १०० टक्के कर्ज वसुली झाली आहे.
यावेळी असलदे विकास संस्थेचे चेअरमन भगवान लोके, हरकुळ चेअरमन आनंद ठाकूर, फोंडा चेअरमन संतोष नानचे यांनी बॅंकेकडून विकास संस्थांना होणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच विकास संस्थांना असलेल्या समस्या मांडल्या.
