गुरुपौर्णिमेनिमित्त मांगवलीत महाप्रसादासह शासकीय योजनांची जनजागृती
शेतकरी, ग्रामस्थ व स्वामीभक्तांना कृषी योजना, पिक विमा, डिजिटल सुरक्षितता आणि बँकिंग सुविधांची माहिती
वैभववाडी
गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मांगवली येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री अमोल श्रीधर राणे व सौ. योगिता अमोल राणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थ व स्वामीभक्तांसाठी विविध शासकीय योजना, पिक विमा, डिजिटल सुरक्षितता तसेच बँकिंग योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात कृषी विभागाचे श्री एम. के. शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती अनिता वाघमोडे यांनी सामाजिक वनीकरणाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीचे श्री संदीप घुगरे यांनी पिक विमा योजनेची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने श्री महेश रावराणे यांनी डिजिटल फसवणुकीपासून बचाव, अटल पेन्शन योजना, विविध विमा योजना आणि बँकिंग सुविधांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आत्मा समिती वैभववाडीचे अध्यक्ष मंगेश कदम, महेश संसारे, सखाराम राणे, वनरक्षक अंकित काशीद, विशाल राणे, सौ. स्नेहल राणे, सचिन आयरे, मंगेश कोलते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला-पुरुष आणि स्वामीभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री अमोल श्रीधर राणे यांचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच विशेष सेवा देणारे श्री सखाराम उर्फ बाबू अण्णा यांचे आभार व्यक्त करण्यात आले. धार्मिक उत्सवासोबतच शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री महेश संसारे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून, समाजहितासाठी अशा उपक्रमांचे आयोजन प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
