जो मुलगा आपल्या विद्यार्थी जीवनात टी-शर्ट विकत घेऊ शकला नाही. दोन रुपयात वडापाव स्वस्त मिळतो म्हणून थोडे पायी अंतर जाऊन दोन रुपयांची बचत करणारा तुकाराम आज महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांतील सर्वात चर्चेचा लोकप्रिय व समाजाभिमुख सनदी अधिकारी बनलेला आहे.
श्री तुकाराम मुंढे यांचा पूर्ण प्रवासच म्हणजे एका चित्रपटाचे कथानक आहे. पुढे मागे चित्रपट निघेलही. पण त्यांचा जीवन प्रवास हा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा जागविणारा पुढे नेणारा असाच आहे. शेती करून प्रसंगी उपाशी राहून महाविद्यालयात पायी जाऊन या विद्यार्थ्याने संघर्ष करून जे यश गाठलेले आहे. ते निश्चितच महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिण्यासारखे आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या एसबी महाविद्यालयात त्यांचा प्रवेश झाला. दिव्यांग भाऊ बाबासाहेब यांना पण अशोकराव व तुकारामांनी संभाजीनगरला शिकायला आणले .प्रवेशासाठी तुकाराम आपल्या दिव्यांग बंधूंना घेऊन लाईनमध्ये उभा राहिला. बंधू दिव्यांग तर होतेच. शिवाय अशक्त पण होते. त्यांना लाईन मध्ये जास्त वेळ उभे राहणे शक्य नव्हते. म्हणून तुकारामांनी सरळ लाईन तोडून प्रवेशाची खिडकी गाठली. प्रवेश देणारा बाबू ओरडायला लागला. तुकारामाने त्याला समजून सांगितले की माझा भाऊ अपंग आहे .तो जास्त वेळ उभा राहू शकत नाही. पण बाबू तो बाबू. तो ऐकायला तयार नव्हता. तुकाराममधील तरुण जागा झाला. त्याने चक्क त्या बाबूची कॉलर धरली. हा तुकाराम नावाचा युवक इतका आक्रमक असेल असे त्या बाबुला वाटलेच नाही. अन्याय सहन करायचा नाही हे धडे तुकारामाने महाविद्यालयीन जीवनातच गिरविले.
तुकारामाचे बंधू बाबासाहेब दिव्यांग होते. त्यामुळे महाविद्यालयात त्यांना ऑटो रिक्षा ने जाणे येणे करावे लागत होते .त्यामुळे वडील बंधू श्री अशोकराव यांनी श्री तुकाराम यांना स्कूटर घेऊन दिली .ते वर्ष होते 1995 चे. 1995 साली स्कूटर असणे म्हणजे फारच मोठी गोष्ट. पण तुकारामासाठी ती चैनीची गोष्ट नव्हती .बाबासाहेबांना नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. शिवाय पेट्रोल वापरावर मर्यादा होतीच.
अशोकरावांनी इंग्लिश स्पीकिंग क्लासची धुरा तुकारामांना दिली होती. तुकाराम मुलांना शिकवीत होता आणि स्वतः पण शिकत होता. त्यांच्या क्लासमध्ये काही केनियन मुलं आलीत. तुकाराम त्यांना इंग्रजी शिकवायचा. त्यांच्याबरोबर जागतिक विषयावर चर्चा करायचा. त्यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडत होती .शिवाय याच काळात त्याला वर्तमानपत्र वाचण्याचा छंद लागला. पुढे तो आयएएस करण्यासाठी उपयोगी पडला.
पदवी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये तुकाराम राज्यशास्त्र विद्यार्थी विषयात विद्यापीठातून पहिला आला. अशोकरावांचे म्हणणे होते की तुकारामने पुण्याला शिकले पाहिजे. त्यांच्या सूचनेप्रमाणे तुकाराम पुणे विद्यापीठामध्ये गेला. पुण्यामधल्या हा त्याचा पहिलाच प्रवेश. विद्यापीठात प्रवेश मिळत होता .पण वसतीगृहाचे नक्की नव्हते. तसाच तो एस पी महाविद्यालयात गेला. इथे पण वसतीगृह प्रवेश नव्हता. आपली प्रवेश झाला तरी पुण्याला राहणे आपल्याला परवडणार नाही. अशोकरावने त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. धक्के बुके खात तुकाराम मुंबईला मुंबई विद्यापीठात पोहोचला. मुंबई ही मायानगरी. त्या महानगरीत आपला ठिकाणा लागेल की नाही याबद्दल तुकाराम साशंक होता. तिथेही वसतीगृह मिळणार नाही असे वातावरण होते. त्यामुळे आपण छत्रपती संभाजी नगरलाच आपण एम ए करू असे तुकारामाने ठरविले
तुकारामाच्या बंधूंनी अशोकरावांनी तुकारामाचे ध्येय आयएएस ठरविले होते. म्हणून पदवी परीक्षा पास झाल्यानंतर तुकारामाने पुस्तक खरेदीसाठी सरळ दिल्ली गाठली. त्या काळात दिल्लीचे जवाहर बुक डेपो खूपच प्रसिद्ध होते. धावत पळत अडचणीवर मात करीत तुकाराम जवाहर बुक डेपोत पोहोचला .पुस्तके खरेदी केली. आणि रेल्वेचे आरक्षण नसल्यामुळे जनरल डब्यातून दिल्ली ते मनमाड पर्यंतचा प्रवास केला. सोबत पुस्तकांचा भला मोठा गठ्ठा होता. खरं म्हणजे तो गठ्ठा नव्हता तर ती आयुष्य भराची शिदोरी होते. पुढे कामात येणार होती.
या सगळ्या धावपळीला यश आलं. तुकारामचे जे व्यक्तिमत्व लहानपणापासून तयार होत होते .त्याला त्याचे वडील व भाऊ अशोकराव जे खतपाणी घालत होते आणि भाऊ तहसीलदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या इंग्लिश स्पिकिंग क्लासेसची जबाबदारी तुकारामवर दिली होती .त्यामुळे तुकारामचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होण्यामध्ये मदत झाली आणि त्याचा असा परिणाम झाला की महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद नाशिक अमरावती व नागपूर येथे आयएएसच्या प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या शासकीय आहेत .त्यामध्ये तुकारामाने प्रवेशासाठी अर्ज केला होता आणि तुकारामाने घेतलेल्या परिश्रमाचे फळ फळास आले .मुंबईच्या एसआयएसी या आईएएसला प्रशिक्षण देणाऱ्या व मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसमोर असलेल्या संस्थेमध्ये त्याची निवड झाली. तुकारामाचा आनंद गगनात मावेना. या संस्थेमध्ये फक्त 50 मुलांची निवड होत होती. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 50 विद्यार्थ्यांची निवड म्हणजे तारेवरची कसरतच. पण ही तारेवरची कसरत तुकाराम यांनी पार पाडली आणि या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास ते पात्र ठरले.
मुंबईच्या एस आय एस सी मध्ये प्रवेश झाल्यानंतर राहण्याची चिंता मिटली .जेवणाची चिंता मिटली .ग्रंथालयाची चिंता मिटली आणि अभ्यासासाठी चांगले वातावरण तयार झाले. शिवाय वेळोवेळी आयएएस चे जे प्रशिक्षण मिळायचे ते वेगळेच. हा सगळा खर्च महाराष्ट्र शासनातर्फे केला जातो.
या ठिकाणी तुकारामाच्या वाट्याला आली ती अरुंद खोली . मुंबईला तसाच जागेचा प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असणारी जागा तर सोन्यापेक्षा प्लॅटिनम पेक्षाही महाग असणारी आहे. त्या ठिकाणी हे केंद्र. त्या अरुंद खोलीत आयएएस करणारे 11 आय ए एस करणारे विद्यार्थी राहायचे. काही खोल्या स्वतंत्र होत्या पण त्यामध्ये तुकारामाचा नंबर लागला नाही. या खोलीमध्ये 11 लोकांना मनासारखे झोपता देखील यायचे नाही. पण ही आयएएस करणारी मुले हुशार होती .ती आलटून पालटून अभ्यास करायचे. त्यामुळे सर्वांना सोयीचे व्हायचे.
या आयएएस सेंटर जवळच वडापाव मिळायचा. पण तो पाच रुपयाचा होता. वडापावला पाच रुपये खर्च करणे तुकारामच्या बजेटमध्ये बसणारे नव्हते. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. थोड्या दूर अंतरावर वडापाव तीन रुपयाला मिळायचा. तुकारामांनी तीन रुपयाचा पर्याय स्वीकारला .कारण की त्यामध्ये दोन रुपयाची बचत होणार होतीआणि त्या काळात ते दोन रुपये म्हणजे त्याला संजीवनी सारखे ठरणारे होते.
महाराष्ट्रातून जे 50 विद्यार्थी निवडले जातात ते हुशारच असतात. शिवाय प्रामाणिकपणे अभ्यास करणारे असतात. असेच एकदा अकॅडमिक विषयावर चर्चा सुरू होती. अशा चर्चा नेहमीच व्हायच्या. अशा मैफली नेहमीच रंगायच्या. चर्चा होती राष्ट्रपती निवडणुकीची. तुकाराम तर राज्यशास्त्राचा विद्यार्थी. त्यातही त्यात पारंगत असलेला. त्यांनी सांगितले की राष्ट्रपतीची निवडणूक ही लोकांमधून होत नाही तर लोकांनी निवडूण दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात ते राष्ट्रपतीची निवड करतात.
दुसरा एक मुलगा मात्र या विधानाला संमती देत नव्हता. तुकाराम मात्र ठाम होता. तो मुलगाही तितकाच ठाम होता. शेवटी तुकारामांनी त्याला पुस्तके आणण्यास सांगितले .पुस्तके वाचले आणि मग त्या मुलाने तुकारामाची माफी मागितली. तुकारामाने जे सांगितले होते ते तंतोतंत खरे होते. काटेकोर अभ्यास तुकारामांचा होता.
तुकाराम ज्या परिसरामध्ये राहत होता तो परिसर म्हणजे सुवर्णमय परिसर होता. रात्र झाली की मुंबईचे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूचा परिसर हिऱ्यासारखा चमकायचा. तुकारामाला वाटायचे आपण जर योग्य मेहनत घेतली सातत्य ठेवले तर आपलेही आयुष्य असेच चमकल्याशिवाय राहणार नाही .
आणि आज ही गोष्ट खरी ठरली आहे. ज्या तुकारामाच्या पायात मॅट्रिक पर्यंत चप्पल नव्हती. महाविद्यालयात जायला सायकल नव्हती. वडापाव खायला पुरेसे पैसे नव्हते .तो तुकाराम आज महाराष्ट्रातील अग्रगण्य आयोजित आयएएस ऑफिसर म्हणून सर्वत्र ओळखल्या जात आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
