भुईबावडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
वैभववाडी :
आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या दक्षिण विभाग (सांगली) विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी भुईबावडा गावचे सुपुत्र व मुंबईतील उद्योजक श्री. सुनील सदानंद नारकर यांची निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेने प्रथमच कोकणातील सदस्य म्हणून त्यांची निवड केली असून या निवडीमुळे भुईबावडा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी नारकर यांना निवडपत्र नुकतेच प्रदान केले.
या निवडीमुळे भुईबावडा गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुनील नारकर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्या वर्तुळातूनही या निवडीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
