तीन महिन्यांचे धान्य वाटप सुरू
अंत्योदय लाभार्थ्यांनी साखरेचाही लाभ घ्यावा – तहसीलदार दीक्षांत देशपांडे
कणकवली
आपत्कालीन कालावधीचा विचार करून रास्त दराच्या धान्य दुकानांमार्फत सध्या तीन महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येत आहे. संबंधित लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित केले जात आहे. यासोबतच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रती महिना एक किलो याप्रमाणे तीन किलो साखरही देण्यात येत आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप साखरेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी संबंधित रास्त दर दुकानदारांशी संपर्क साधून साखर तात्काळ प्राप्त करून घ्यावी, असे आवाहनही तहसीलदार देशपांडे यांनी केले आहे.
