ठाणे :
कवी संतोष खरटमोल यांची आणि माझी भेट वीस वर्षांपूर्वी एका कवी संमेलनातील कवीच्या स्पर्धेत झाली, या काव्य स्पर्धेत अनेक कवींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये संतोषची कविता नंबरात आली होती. त्यांची कविता उत्तम होती व सादरीकरणही उत्तम होते. त्यावेळी खुणगाठ बांधली की, एकेदिवशी एक चांगला कविता संग्रह कवीप्रेमीच्या हाती पडेल तो दिवस आज उगवला असे नाट्यलेखक , दिग्दर्शक,परिक्षक, साहित्यिक विश्वास साहेबराव धुमाळ यांनी श्री संत सावता माळी मंडळ येथे युवा साहित्य प्रतिष्ठान आणि खरटमोल आयोजित कविता संग्रह प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन,सरस्वती पूजन करण्यात आले. विश्वास धुमाळ पुढे म्हणाले की, कविता संग्रहातील प्रत्येक पान आपलेसे वाटावे तसेच मुख्यपृष्ठ प्रेरणा देणारे असे नमूद केले. सुरूवातीला कवी सतोष खरटमोल म्हणजे की, माझी पहिली कविता एका वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली त्या कवितेबद्दल माझे कौतुक झाले. तिथून प्रवास सुरू झाला तो आजच्या दिवशी कविता संग्रह आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रकाशित होऊ शकला असे नम्रपणे सांगितले. प्रमुख पाहुणे कवी, लेखक डॉ. राम शिंदे यांनी सांगितले की, संतोष खरटमोल यांच्या कविता कवीच्या मनाचे अनेक कंगोरे पाहवयास मिळतात.नवरसापैकी प्रेम रसात संतोषजी रममाण होऊन जाताना जाणवते.त्याचवेळी त्यांच्यातील समाजसेवेचा एक वेगळा कोपरा देखील त्यांच्या कवितांमधून डोकिवतिना दिसून येतो आणि पावसाचे व कवीचं जवळचं नातं असावं अशी जाणीव होते असा वाचनीय कविता संग्रह प्रत्येकांनी विकत घेऊन वाचवा असे विषद केले. यावेळी कवी,लेखक चंद्रहास रहाटे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रमोद कांदळगावकर यांनी गुंफण शब्दांची! मुळात नांवच किती सुरेख आहे. गुंता आणि गुंफण दोन शब्दांत किती फरक आहे हे अधोरेखित करून भविष्यात अधिकाधिक कविता संग्रह प्रकाशित होवोत अशा सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी गुंफण शब्दांची यातील कवितांचं वाचन सर्वश्री विशाल ढवळे, ओमकार देसाई, गजानन परब, आनंद नाडकर्णी, सविता देशमुख यांनी केले. या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.पाणिनी वेंगुर्लेकर यांनी मौलिक शब्दात केले. मोठ्या संख्येने कवी, वाचक, रसिक उपस्थित होते.
