*एक दिवस महिला दिन साजरा करून मिळेल का सन्मान स्त्रीला..?*
देशात सर्वत्र वर्षातून एकदा महिला दिन साजरा केला जातो. विविध क्षेत्रातील महिलांना मानसन्मान दिला जातो. इतकंच काय कितीतरी महिलांचे गुणगान गायले जातात, कार्याचा गौरव केला जातो..परंतु एक दिवस केलेल्या सत्कार सोहळ्याने बदलते का माणसांची मानसिकता..? की, स्त्री पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या रोजच्या वेदना कुरवाळत जगते..? असे प्रश्न उभे राहतात याचं कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला एस टी बस स्थानकात सफाई कामगार असलेल्या महिलेने मांडलेली व्यथा..!
वेंगुर्ला बस स्थानकात दिवसभरात जवळपास ४३ एस टी बस ये जा करत असतात. एक एस टी बस झाडू मारून साफ करणे, काचेची तावदाने, पुढील मागील भल्यामोठ्या काचा धुवून साफ करणे, गाडी धुवणे हे वाटतं तितकं सोपं काम नाही. परंतु दिवसभराच्या ड्युटी मध्ये हे काम वेंगुर्ला आगारात केवळ एकच महिला कामगार करत असते. आपल्या घरासमोर लागलेली दुचाकी, लाडकी असलेली एक चारचाकी मोटार धुवताना आपल्या तोंडाला फेस येतो त्याठिकाणी ही एकटी महिला कामगार ४३ पैकी तिच्या ड्युटी मध्ये येणाऱ्या बहुतांश गाड्या धुवून साफ करते हा तिच्यावर होत असलेला अन्याय असून जिथे महिलांचा सन्मान करताना जागतिक महिला दिन साजरे केले जातात, सरकारकडून लाडक्या बहिणी म्हणून महिला वर्गाला मानसन्मान दिला जातो तिथे त्याच एकट्या महिलेवर अशाप्रकारे गाड्या साफसफाई करणे, गाड्या धुवणे इत्यादी कामाचा बोजा लादून महिला वर्गाची पिळवणूक का केली जात आहे.? असा प्रश्न आ – वासून उभा राहिला आहे.
यावेळी घडलेली घटना अशी की, शिवसेनेचे माहिमचे आमदार महेश सावंत हे मातोंड या त्यांच्या मूळ गावी आले असता शिवसेना एस टी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांच्या आग्रहस्तर ते सेनेच्या संघटनेच्या फलकाचे अनावर करण्यासाठी वेंगुर्ला आगार येथे गेले असता त्यांनी वेंगुर्ला येथील आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी आगार व्यवस्थापकांच्या दालनात वेंगुर्ला आगारात सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या महिलेने प्रवेश करत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक व आमदार महेश सावंत यांच्या समोर आपली व्यथा मांडली. त्यावेळी त्या महिला कामगार असलेल्या स्त्रीला आपले अश्रू आवरणे देखील कठीण झाले. तिने आपली व्यथा मांडताना म्हणाली की, “मी एकटीच महिला कामगार ड्युटीवर असते. दिवसभरात येणाऱ्या एस टी बस मला एकटीला धुवाव्या लागतात. एवढी मोठी एस टी बस धुवणे हे मी एकटी महिला कसे काय करणार..? मला एकटीला बस साफसफाई करून धुवताना खूप त्रास होतो. एकटीच सफाई कामगार असल्याने कधी सुट्टी हवी असेल तरी सुट्टी मिळत नाही. कधी अपरिहार्य कारणांसाठी देखील घरी जाऊ देत नाहीत. त्यामुळे मला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो आहे”.
महिला सफाई कामगाराच्या प्रश्नावर बोलताना आगार व्यवस्थापकांनी ही एकटीच ४३ बसेस धुवत नाही तर काही बसेस साफ करते आणि धुवते असे म्हणणे मांडत आपली बाजू मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती पाहिली असता सदर महिलेला होणारा त्रास ही सत्य असल्याचे तिच्या सांगण्यावरून आणि आगार व्यवस्थापकांनी केलेल्या थातूरमातूर खुलाशावरून दिसून आले. यावेळी आमदार महेश सावंत आणि सेना एस टी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांनी आगार व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले.
एकीकडे महिलांचा सन्मान म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून प्रत्यक्षात राबविली. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले, पुन्हा सरकार सत्तेवर आले. परंतु महिलांच्या सन्मानाचे काय..? त्यांना फक्त ८ मार्च या एकाच दिवशी सन्मान मिळणार आणि वर्षभर त्यांचे शोषणच होणार का..? असा प्रश्न उभा राहत आहे. वेंगुर्ला येथील एस टी आगारात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेने आपली व्यथा जेव्हा डोळे भरून सांगितली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या..परंतु तिच्या सन्मानासाठी एस टी आगार व्यवस्थापकांकडे मात्र कोणतीही योजना नव्हती की त्यावर उपाय..! महिलांना माता, भगिनी, भार्या, सखी अशी विशेषणे देणारे महिलांवर होणारे अन्याय असेच उघड्या डोळ्यांनी पाहत बसणार का..? एकीकडे महिलेला अर्धे तिकीट, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून महिना दीड हजार सन्मान निधी द्यायचा आणि दुसरीकडे कष्ट करून पोट भरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिलेची पिळवणूक करायची अन्यायाच्या सन्मानाला ठेच पोचवायची.. अशी दुपटी भूमिका का घेतली जाते..? अशाप्रकारे महिलेचे शोषण होत असेल तर त्यावर कोणी कारवाई करणार की नाही…? तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी कोणीतरी लगाम घालणार की नाही..?
महिलांच्या सन्मानाचा दिंडोरा पिटणारे सरकार, आमदार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि एस टी प्रशासनाचे अधिकारी एका महिलेवर होणाऱ्या अन्यायाबाबत आता नक्की काय भूमिका घेणार..?
तिला न्याय मिळणार…की ती त्याच अन्यायाच्या कचऱ्या झाडू मारत, बुरसटलेल्या शासकीय व्यवस्थेचे डाग धुवून काढत खितपत पडणार..? हे येणारा काळच ठरवेल हे मात्र नक्की..!