गाईंचे संवर्धन करण्यासाठीच गोवर्धन गोशाळा काम करेल; खास.नारायण राणे
कणकवली : तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे उद्घाटन ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने गोशाळेतील विविध उपक्रमांची माहिती खासदार नारायण राणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संदीप कुडतरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही खरी संकल्पना दोन्ही नातवांच्या प्रेरणेतून मिळाली आहे. गोमातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांना गाईंना दररोज चारा घालून शाळेला जाण्याची आवड लागली होती. त्यामुळे ही गोशाळा उभारली आहे. या गोशाळेचा एकूण परिसर ७० एकरचा असून त्यामध्ये २३ एकर मध्ये ही गोशाळा उभारण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्र चाऱ्यासाठी तसेच केवळ गाईच नव्हे तर जगभरातील उच्च जातीच्या शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांचे पालनही इथे केले जाणार आहे. केवळ गाईंची सेवा आणि आवडीसोबतच कोकणातील तरुण तरुणींना गाय म्हणजे काय ? गाईला माता का म्हणतात ? याबाबत नव्या पिढीला या गोशाळेतून माहिती मिळेल.
हिंदू संस्कृतीत गाय म्हणजे समृद्धी आहे. करंजे येथील गो शाळेचे ११ मे रोजी दुपारी १.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनाही निमंत्रण दिले आहे. यावेळी खासदार आणि म्हणाले की गोवर्धन गोशाळा सुरू करण्यापूर्वी राजस्थान, गुजरात मधील गोशाळा पाहून आलो. गाईंच्या विविध जातींबद्दल माहिती गोळा केली. त्यानंतर करंजे येथे जंगलमय भाग होता. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती म्हणून गोशाळा करण्याचा निर्णय घेतला. तसेच गाईंचे संवर्धन करण्यासाठी गोवर्धन गोशाळा काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत. गावठी गायी आहेत, गीर गायी आहेत. त्यांच्या तुपाचा दर १९,५०० रुपये किलो आहे. त्यामुळे कोकणातील तरुणांनी उद्योग करावेत. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना मुबलक पाणी असल्याने त्यांनी गाई पाळाव्यात यासाठी मार्गदर्शन केले जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, तरुणांनी दुधाच्या व्यवसायाकडे वळावे, यासाठी भव्य दिव्य ही गोशाळा मार्गदर्शन करणार आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ५०% अनुदान असलेली योजना पुढे नेणार आहे. दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल त्यातूनच त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील असे खासदार नारायण यांनी सांगितले.
ते म्हणाले या गोशाळेत श्रीकृष्णाचा संपूर्ण जीवन प्रवास प्रतिमा स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यापासून नागरिकांना प्रेरणा मिळेल. गाईच्या शेणापासून खत, रंग तयार करण्याचे प्रकल्पही होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शेण विकत घेतले जाईल त्यापासून खत आणि बायोगॅस बनवला जाणार आहे तसेच गाईच्या गोमूत्रावर देखील प्रक्रिया होईल तसेच त्यातून औषधी तयार केली जातील. या प्रकल्पातून जिल्ह्यातील दोनशे लोकांना रोजगार मिळणार आहे. गोपालन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले जाईल. त्यापासून दही, पनीर, तूप, चीज, बटर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवले जातील. त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणावी असा आमचा प्रयत्न आहे. गाईला आम्ही पवित्र मानतो तिची सेवा व्हावी या हेतूने हा प्रयत्न आहे. जिल्ह्यात जी भाकड जनावरे आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही ठेवण्याची व पालन पोषण करण्याची व्यवस्था करणार आहोत त्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी ठेवण्यात आले आहेत. जर एखादी गाय जखमी असेल तर त्या जखमी गाईला गोशाळेत आणण्यासाठी रुग्णवाहिका ठेवण्यात येईल असेही खा. राणे यांनी सांगितले.
या गोशाळा परिसरात काही महागडी झाडे आणून लावली आहे. त्यांची संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये पिंपळ झाड व अन्य वृक्ष लागवड येथील लोकांना पाहण्यासाठी केली आहे. मला आता जिल्ह्यात एक चांगली नर्सरी बनवायची आहे, असेही खास. नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या गोवर्धन शाळेला भेट द्यावी तसेच नागरिकांनीही गोपालन व वृक्ष संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.