You are currently viewing मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी

मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*

 

*मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी*

 

“साहित्य संगीताचा सन्मान, सदैव होतो घरीदारी, शब्दांक्षरांच्या तोरणाने साकारली इये मराठीचिये नगरी”, सह्याद्रीच्या कुशीत लाभलेला जन्म म्हणजे परमभाग्यच. ‘आई’ या नात्याचा अभिमान प्रत्येकालाच असतो, पण ते नाते शब्दांत वर्णन करता येत नाही. तसेच माझ्या ‘मायबोली मराठीचे’ आहे. भाषेची श्रीमंती मराठी मनाच्या साधेपणाचे प्रतिक आहे. संत वाङ्मय :– ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, गाथा तसेच संत नामदेवांच्या साहित्यातून जीवनाचे सार बालपणापासूनच संस्काररूपाने घराघरांतून लाभले आहेत. साहित्यातील विविध प्रकारांनी वाचनसंस्कृती समृद्ध केली ती याच मराठी भाषेने. हे सर्व लिहिताना एका सुंदर गीतपंक्तीची आठवण झाली. “आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे ‘अ’,‘आ’,’इ’ ”

वैविध्येतील संपन्नता मराठी भाषेचे सौंदर्य वाढवते, गांवकुसाचे दर्शन घडविते. प्राकृत जननी असलेली, संस्कृत भाषेचं लेणं लाभलेली, देवनागरी लिपीतून साकार होते. अज्ञाताला [इतर भाषिकांना] ही प्रेमांत पाडते, उत्सुकता वाढवते. साधे आणि सहज सुस्वरूप असणारी मायमराठी अभ्यासताना मात्र तिचे खरे रूप दाखवून देते. समजून घेणे किती अवघड आहे याची प्रचिती पदोपदी येते. मोठमोठ्या शहरांत बोलीभाषेचा छाप उमटवत वेगळे स्थान निर्माण करते. मनाच्या सर्वांत जवळची, आईवडील आणि मुले जसे नाते तसे हे सर्व खरे तर शब्दांत वर्णन करता येत नाही..

हा महासागर दृश्य स्वरूपांत सामोरा येतो तेव्हां सुरवांत कुठून करावी असा प्रश्न पडतो. जीवनप्रवासांत वेगवेगळ्या क्षणी आई मुलांना खूप काही शिकवण देत असते त्याचप्रमाणे, मराठी भाषा जितकी मधाळ, रसाळ असते तितकीच काही ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढताना तिला तलवारीच्या पात्याचीही धार असते. विचारांच्या सुसंगती सोबत शौर्यगाथेचे बळ मराठी भाषेच्या शब्दां-शब्दांतून ओतप्रोत भरलेले दिसते. परदेशांत, परप्रांतात मराठी भाषेचा सन्मान मातृभाषा म्हणून होतोच आहे. कर्तुत्वाच्या भरारीत ती कधीच लांब जाऊ शकत नाही. कार्यालयीन संपर्क भाषेत विविधता असली तरी, महाराष्ट्राबाहेर दोन मराठी माणसे एकत्र आली आणि मराठीतून संभाषण सुरू झाले की चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. अशावेळी शहरांच्या / गावांच्या सीमारेषा धूसर होतात, ही मात्र कमाल असते ती आपल्या मराठमोळेपणाची, भाषेची. मायबोली मराठी लेखनातून सुखाची सर होते तर वाचन करता करता निसर्गातील हिरवळीच्या रंगांची विलोभनियता जपते.

मराठी भाषा अविरत, अखंडित जपली पाहिजे ही जबाबदारीची जाणीव पुढच्या पिढीला करून दिली पाहिजे. असा वसा-वारसा लाभलेली मधली पिढी ना इंग्रजीत कमी पडली, ना मराठीत. दोन्ही मध्ये पारंगत असल्यामुळे आणि राष्ट्रभाषा हिन्दीचेही महत्व ओळखल्यामुळे अनेक संधी प्राप्त झाल्या. हे म्हणजे काय? याचा अर्थ काय? अशी क्षणोक्षणी गाडी अडली नाही. सरावाने जसा रोजचा गृहपाठ देखील चांगला होतो, तसं मोठ्या सुट्ट्यांमधील वाचनालयाची ओळख, मराठी भाषेचे वाचन, दहा/वीस ओळींचे शुद्धलेखन याने निश्चितच फायदा होतो. भविष्यांतील सोनेरी क्षितीजाचे दर्शन होण्यासाठी आधी किनाऱ्यावर फेरफटका मारता आला पाहिजे, वेळ देत आनंद लुटला पाहिजे. भाषाविश्वाच्या पायवाटेवर भावविश्वाची अनुभूती उमटली पाहिजे. मराठी बाण्यासोबत मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही आता काळाची गरज आहे. जागतिक व्यावहारिकता म्हणून इतर भाषा शिकणे गैर नाही, त्याचबरोबर मराठी लिहिता-वाचता न येणे ही खेदजनक बाब आहे. खरोखर मनपासून जेव्हां हे पटेल तेव्हांच दिवसेंदिवस वाढणाऱ्या रोपट्यासारखे भविष्यामध्ये मराठी भाषा जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असेल. बाल्यावस्थेतील भाषिक जडणघडण आयुष्यभराची संगत असते.

मराठी भाषेचे अलौकिकरूप म्हणजे ती पदरावरील जरातारीच्या मोरासाहित खुलते, तसेच अभिमानाचा मानबिंदू असलेल्या डोईवरच्या फेट्यातही विराजमान होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरांत, सनई सुरांत शुभक्षण साजरे करते. भाषाशैलीतील वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रांतील कानाकोपऱ्यात दरवळणारा परिमळ जो नकळत आपल्यापर्यंत येऊन मिळतो. त्याने आपले आयुष्य सुगंधित केले आहे हे विसरून चालणार नाही. वृत्त अलंकारांचा साज ल्यालेली, वाक्प्रचार, म्हणींद्वारे प्रकट होणारी, नागरी-ग्रामीणतेचे पैलू लाभलेली, अशा माझ्या मराठी भाषेला शत शत प्रणाम.

“नवचैतन्याने जतन करू मायमराठीची धुरा,

मायबोलीचा सन्मान ही वचनपूर्ती मनी धरा.”

 

©मेघनुश्री [लेखिका पत्रकार]

मोबाईल : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा