प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द
-पालकमंत्री नितेश राणे
•लोककल्याणकारी योजना राबविण्यावर भर
• कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य
•’नशामुक्त जिल्हा’ म्हणून ओळख निर्माण करणार
सिंधुदुर्ग दि २६ (जिमाका) सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. अशा विविध महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी १७१ कोटी रुपयांचा नियतव्यव आणि २२९ कोटींची अतिरिक्त मागणी असा एकूण ४०० कोटींचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहिल. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना प्राधान्य देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास हाच माझा ध्यास असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालय, पोलिस परेड ग्राऊंड येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त् पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी कुष्ठरोग निवारण शपथ देण्यात आली.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्य घटनेचा स्विकार करुन २६ जानेवारी १९५० रोजीपासून अंमलात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. दावोस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले. या करारांमुळे कोकणात आणि विशेषत: सिंधुदर्ग जिल्ह्यात देखील अनेक प्रकल्प निर्माण होणार असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार असेही त म्हणाले. राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार. प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबरच विजयदुर्ग पोर्ट पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच ‘फिशरी क्लस्टर’ देखील आणणार. ‘जिल्हा तिथे मत्स्यालय’ ही अभिनव संकल्पना राबवणार. राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सिस्टीमव्दारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मच्छीमारीला प्रतिबंध बसणार आहे. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत अशा १० स्टीलच्या नौका मिळविण्यासाठी आणि अंमलबजावणी कक्षाची उभारणी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. किनारपट्टी विकासासोबतच मच्छीमार बांधवांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करणार. ‘वाढवण’ बंदर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कार्यात मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे-
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्याप्रमाणे सर्वांनी नियेाजन करावे
· दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले. या करारांमुळे कोकणात देखील अनेक प्रकल्प निर्माण असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
· राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार. प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबरच विजयदुर्ग पोर्ट पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच ‘फिशरी क्लस्टर’ देखील आणणार. ‘जिल्हा तिथे मत्स्यालय’ ही अभिनव संकल्पना राबवणार.
· राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सिस्टीमव्दारे संपूर्ण किनारपट्टीवर
· सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत अशा १० स्टीलच्या नौका मिळविण्यासाठी आणि अंमलबजावणी कक्षाची उभारणी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे
· दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना प्राधान्य
· मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – 1 लाख 93 हजार अर्ज मंजूर
· मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत – 1 हजार 147 उमेदवांराची निवड
· ‘नशामुक्त जिल्हा’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. कोणतेही अवैध धंदे जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाहीत. अंमली पदार्थ, अवैध दारु, मटका, जुगार अशा सर्व धंद्याविरोधात पोलिस प्रशासनाने विशेष मोहिम राबवून त्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश
· आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन वाढीबरोबरच रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्यावर भर
· हॉटेल व्यवसायिक आणि टूर ऑपरेटर्सचे संमेलन
· नाधवडे, वैभववाडी येथे एम.आय.डी.सी. आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात प्राणी संग्रहालयासाठी देखील मी प्रयत्नशील आहे. तसेच मार्केट यार्डसह विविध जोडधंदे निर्माण करण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे.
· गाळा काढण्यासाठी आपण १ फेब्रुवारी पासून विशेष मोहिम हाती घेत आहोत. पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी ४ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यांनतर टप्याटप्याने सर्व ठिकाणचा गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पुर परिस्थिती उद्भवणार नाही.
· सन २०२४-२५ या वर्षामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत गट लाभार्थी मंजुरी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात व देशात प्रथम क्रमांकावर आहे.
· ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका जिल्ह्यात अव्वल तर राज्यात व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
· लेक लाडकी योजनेअंतर्गत ७९५ मुलींना रुपये ५ हजार प्रमाणे ३९ लाख ७५ हजार एवढी रक्कम वितरीत
०००००००
विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान
सिंधुदुर्ग, दि. 26 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
उल्लेखनीय सेवेबद्दल अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, अन्वेषण’ प्राप्त झाले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सन 2023 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस मुख्याल येथील राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरक्षक संदिप अशोक भोसले, चिपी विमातळ येथील पोलीस उप निरीक्षक प्रताप विठोबा नाईक, जिल्हा विशेष शाखा मनोज मारुती मांजरेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार विश्वजीत झीलू परब, निवती पोलीस ठाणे येथील श्रीमती अर्चना गोविंद कुडाळकर, स्थागुअशा सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार प्रकाश सहदेव कदम, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार संजय ज्ञानोबा साळवी,स्थागुअशा, सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार डॉमनिक संतान डिसोजा, वैभववाडी पोलीस ठाणे येथील पोलीस शिपाई राहुल भगवान तळसकर यांचा समावेश आहे.
जिल्हा कृषि विभागामार्फत उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांना जिल्हा कृषि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे आंबा उत्पादनामध्ये हापूस आंबा प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तसेच अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे लाल भेंडी 17 फूट 10 इंच उंच एवढे विकसीत केल्याने वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
000000
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 साठी ‘सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅन आणि चित्ररथाचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सौ ऋतुजा नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.