You are currently viewing राणे आणि केसरकर एकत्र आले असले तरी ते जनतेला पटलेले नाही

राणे आणि केसरकर एकत्र आले असले तरी ते जनतेला पटलेले नाही

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत

 

सावंतवाडी :

 

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कोलगाव येथील पाटीदार समाजाच्या सभागृहात सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भोसले, अर्चना घारे- परब, पुंडलिक दळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ नेते विकास सावंत, दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, रुपेश राऊळ, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शेतकरी नेते वसंत केसरकर, रेवती राणे, माजी जि. प. सदस्य मायकल डिसोझा, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी विनायक राऊत म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मायकल डिसोजा यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यांनी आपल्या एका उमेदवाराचे नाव त्यासाठी पुढे केले होते. परंतु, मायकल डिसोजा हा सच्चा कार्यकर्ता असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. त्यामुळे डिसोजा यांच्या पाठीशी मी राहिलो. माझी तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मात्र, पक्षप्रमुखांनी डिसोजा यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. डिसोजा निवडून आले. केसरकर यांनी डिसोजा यांना शिवीगाळ केली. एखाद्या व्यक्तीबद्दल केसरकर यांच्या मनात किती द्वेष भावना असते हे यातून दिसून आले. साळगावकर याचे साक्षीदार आहेत. यातून केसरकर हे भविष्यात वेगळी भूमिका घेणार हे आम्हाला त्यावेळी जाणवले होते. त्यानुसार पूर्वीच्या इतिहासाप्रमाणे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून खोक्यांसाठी शिंदे सोबत गेले. मात्र केसरकर यांची ही संस्कृती मतदार स्वीकारणार नाहीत.

आतापर्यंत दहशतवाद हा मुद्दा उपस्थित करून गेले कित्येक वर्षे नारायण राणे यांच्यावर हल्ला करून जनतेतून सहानभूती घेत होते. परंतु त्यात राणे यांना केसरकर यांनी मिठी मारलेली आहे. राणे आणि केसरकर हे एकत्र आले तरी ते जनतेला पटलेले नाही त्यामुळे या मतदारसंघात आपल्याला 35 हजारांचे मताधिक्य मिळणार आहे हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे, असे खासदार राऊत म्हणाले.

यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत हे हॅट्रिक करणार आहेत. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्यामुळे या सरकारमध्ये विनायक राऊत हे मंत्री असणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा