You are currently viewing दुसऱ्यांच्या कविता ऐकणे म्हणजे आपली कविता समृद्ध करणे: संमेलनाध्यक्षा उषा परब

दुसऱ्यांच्या कविता ऐकणे म्हणजे आपली कविता समृद्ध करणे: संमेलनाध्यक्षा उषा परब

*कोमसाप कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांच्या हस्ते झाले कवी संमेलनाचे उद्घाटन*

 

*कोमसाप कुडाळ शाखेचे “भाकरी आणि फूल” कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले*

 

कुडाळ:

कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेचे “भाकरी आणि फुल” हे जिल्हास्तरीय कवी संमेलन रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ येथील श्री.संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका उषा परब होत्या तर उद्घाटक म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, माजी जिल्हाध्यक्ष रुजारियो पिंटो, कुडाळ तालुकाध्यक्षा वृंदाताई कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, कुडाळ शाखेचे सचिव सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

*कोमसाप कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले कवी संमेलनाचे उद्घाटन*

“भाकरी आणि फुल” कवी संमेलनाचे उद्घाटन कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना डॉ.प्रदीप ढवळ यांनी सांगितले की, “कोणतेही काम करताना स्वतःची ओळख होणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्तम आणि प्रतिभावान होण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही मोठे साहित्यिक होऊ शकता”. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते डॉ.प्रदीप ढवळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.प्रदीप ढवळ यांनी मॉरिशस येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची माहिती दिली व मॉरिशस देश मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी सरावात जास्त प्रयत्न करत आहे, असे सांगत आपण आज जे काही आहे ते केवळ कोकण मराठी साहित्य परिषदेमुळेच असेही आवर्जून सांगितले. यावेळी काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.स्नेहल फणसळकर यांचा तर “भेरा” चित्रपटाच्या यशाबद्दल लेखक प्रसाद खानोलकर यांचा डॉ.प्रदीप ढवळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

*कोमसापचा यंदाचा कार्यकर्ता पुरस्कार साहित्यिका उषा परब यांना*

यंदाचा कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी जाहीर केला. ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी यंदाचा कार्यकर्ता पुरस्कार स्वीकारला. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. “कोमसाप सारख्या संस्थेने आपल्या कार्याची उशिरा का होईना परंतु दखल घेतली याचा आनंद असल्याचे” सत्काराला उत्तर देताना सौ.उषा परब यांनी सांगितले. तसेच कोमसाप मध्ये आपण काम करत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या. “कोमसाप हा एक विचार असून त्याच्याशी एकनिष्ठ राहूया” असे प्रतिपादन कोमसाप कुडाळ शाखेच्या तालुकाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका वृंदाताई कांबळी यांनी केले.

*”दुसऱ्यांच्या कविता ऐकणे म्हणजे आपली कविता समृद्ध करणे”: उषा परब*

आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना उषा परब यांनी “दुसऱ्यांच्या कविता ऐकणे म्हणजे आपली कविता समृद्ध करणे” असे सांगितले. आपल्या अंतरी असलेल्या भावभावना सुखदुःख आपल्या अवतीभवती जे जे दिसते ते सर्व रसायन कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतो. सार्वजनिकरित्या आपण जेव्हा कविता सादर करता तेव्हा ती खाजगी राहत नसून सार्वजनिक होते असे सांगत कवी संमेलनात कविता सादर करणाऱ्या व शेवटपर्यंत इतरांना ऐकणाऱ्या सर्व कवी कवयित्रीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे “झाडांनी पक्षांवर हक्क सांगू नये..” ही परिस्थितीजन्य काव्यरचना सादर केली. यावेळी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन गोविंद पवार, प्रास्ताविक सचिव सुरेश पवार तर आभार प्रदर्शन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले.

*या कवींनी उधळले रंग*

“गुरू म्हणजे सद्गुरू..गुरू म्हणजे भ्राता…” अशी गुरूची महती सांगणाऱ्या काव्यरचनेने कुडाळ हायस्कूलच्या कुमा.दीप्ती सावंत हिच्या काव्य रचनेने संमेलनाला सुरुवात झाली. कवयित्री मंगल नाईक यांनी “पाणी वाचवावे” या शिर्षकांतर्गत “पाणी वाचवावे.. पाणी साठवावे ते आपल्याच हाती आहे…” मालवणच्या अनुराधा आचरेकर यांनी “वाडी…” ही रीतिरिवाजांवर बोलणारी मालवणी कविता सादर केली. “ये रे आज्या किती येळ कधीची ठेयलय वाडी, स्वर्गातून येवक गावली नाय काय रे गाडी..?” असे म्हणत धमाल केली. राजेंद्र गोसावी यांनी “माफक अपेक्षा”, सुरेश वाळके यांनी “स्वर्ग कसा खुलवावा” याचे वर्णन, रामदास पारकर “जीवन कसे जगावे…”, विजयकुमार शिंदे यांनी “निघा खगानो” दुजा निवारा शोधाया जगती पक्षांना वस्तुस्थितीचे दर्शन घडविणारी रचना, दीपाली काजरेकर यांनी “बाईपण भारी तुझे”, अशोक आठलेकर “शाळेची व्यथा”, प्रगती पाताडे, “कष्टाची भाकर” सौ.आदिती मसुरकर यांनी “मराठमोळी नारी” ही स्वरचित लावणी सुरेल आवाजात गाऊन सादर केली. “महाराष्ट्राची राजकन्या मराठमोळी नार नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा ह्यो भार” तर सावंतवाडीचे कवी गझलकार दीपक पटेकर यांनी “येता मिठीत सखये उरते किती तुझी तू..? प्रणयामधे स्वतःला विसरून जात होती..” ही आनंदकंद वृत्तातील अप्रतिम गझल गात सादर केली. दीपाली कांदळगावकर “सख्याची आस”, नाबर मॅडमनी “होती कळी म्हणता म्हणता झाले कधी फुल तुझे”, सानिका वायंगणकर हिने “आयुष्य हसत जगायचं असतं”, महिन शेख “मला शिकायला द्या, पांढऱ्या शालीवरचे काळे मोती मला बघायला द्या…”, कृष्णा गवस “रस्त्यावरील खड्डे” ही विनोदी ढंगाची कविता, रत्नराज जाधव यांनी “सत्यशोधक सावित्रीबाई फुले” ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य याची “किती विस्मरणे…”, तर मालवणी कवी रुजारियो पिंटो यांनी “मोबाईल चोर” व “कायच कळना नाय” अशा रचनांमधून धमाल उडविली.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहल फणसळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा