You are currently viewing एस आर दळवी फाउंडेशनच्या वतीने २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला येथे वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन

एस आर दळवी फाउंडेशनच्या वतीने २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला येथे वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन

वेंगुर्ला :

 

पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने आपल्या उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहीमेला दुपारी २ वाजता प्रारंभ होणार आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनने अग्रक्रमाने शिक्षक सक्षमीकरणासह पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये जल, ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. या प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एस आर दळवी फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीसह जनजागृतीसाठी एस आर दळवी फाउंडेशनने वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. या स्वच्छता मोहीमेचे नियोजन एस आर दळवी फाउंडेशनचे शिक्षक प्रशांत चिपकर आणि फाऊंडेशनची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा टीम करीत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या स्वच्छता मोहिमेत वायंगणी परिसरातील महिलांसह ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन कृष्णा मदने यांनी केले आहे.

या स्वच्छता मोहिमेत फाउंडेशनचे एस आर दळवी फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, सौ सीता दळवी, राज्याध्यक्ष महेश सावंत, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कन्काळ, वायंगणी सरपंच अजय कामत, दाभोली सरपंच उदय गोवेकर, राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री. बागुल आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा