You are currently viewing वरुडचा देव माणूस : पत्रकार गिरीधर देशमुख

वरुडचा देव माणूस : पत्रकार गिरीधर देशमुख

 

एक माणूस पूर्ण गावाचं स्वास्थ चांगलं टिकवून ठेवू शकतो. त्याने मनावर घेतले तर तो काहीही करू शकतो. आज माणसे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. कारण आपली जीवन पद्धती .पण या माणसांना सुखरूप ठेवण्याचे एक पुण्यकर्म एक आमचा पत्रकार मित्र करीत आहे .त्या देवमाणसाचे नाव आहे गिरीधर देशमुख. संपूर्ण वरुड शहर नव्हे तर आजूबाजूचा परिसर या माणसाने आरोग्याच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर ठेवलेला आहे .रोज सकाळी उठणे आणि झोपलेल्या लोकांनाही उठवणे आणि त्यांचे आरोग्य कायम चांगले ठेवणे या उदात्त आरोग्यदायी उपक्रमाला या माणसाने वाहून घेतले आहे. आज वयाची सत्तरी जरी गाठली तरी त्यांच्याकडे पाहिल्यावर हा माणूस 55 – 56 चाच असेल असा अंदाज सर्वजण बांधतात. इतके त्याने स्वतःचे शरीर व्यवस्थित ठेवले आहे. आपण स्वस्थ आहोत. पण या स्वस्थतेचा मंत्र आधुनिक तंत्राद्वारे वरुडच्या घराघरात पोहोचवीणारा एक महामानव म्हणजे गिरिधर देशमुख. यामुळे काही लोक त्यांना गुरुजी म्हणतात. तर काही लोक महाराज म्हणतात. खरं तर हा माणूस खऱ्या अर्थाने संत म्हणण्याच्या पात्रतेचा आहे. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे. गीतांजली मध्ये आहे. नोबेल पारितोषिक मिळाले आहे .त्या कवितेचा आशय असा आहे की मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला .माझं काम माझ्यानंतर कोण करेल .कोणीच उत्तर दिलं नाही .एक पणती म्हणाली ..मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करेल .देशमुखांनी वरुडला ती पणती पेटवली आणि संपूर्ण वरुड गावातील जनतेला आरोग्याच्या बाबतीत योगाच्या बाबतीत जागे केले .आज गिरीधर देशमुखांना ओळखणार नाही असा वरुडमध्ये एकही माणूस नाही .याला कारण कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता लोकांना योगाभ्यास शिकवणे योगासाठी प्रवृत्त करणे वरुडच्या वेगवेगळ्या भागात योगासनाचे नियमित वर्ग सुरू करणे यासाठी या देव माणसांनी स्वतःला वाहून घेतले आहे .स्वतःचा पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळून त्यांनी केलेले व करीत असलेले कार्य निश्चितच नोंदणीय आहे. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक प्रा.मधुकर केचे यांनी वरुडला झोपलेले गाव म्हटलेले आहे. पण या झोपलेल्या गावाला आज या माणसाने जागे केलेले आहे. नुसतं जागे केलेले नाही तर क्रियाशील तत्पर तेजस्वी व तपस्वी केलेले आहे. आज गिरीधर देशमुख यांनी आपला शिष्य संप्रदाय तयार केलेला आहे आणि तो देखील गिरीधर देशमुखांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून लोकांना जागे करण्याचे काम वरुड व वरुडच्या परिसरात करीत आहेत .एक दैनिक वर्तमानपत्र आणि तेही वरुड सारख्या तालुक्याच्या ठिकाणावरून चालवणं किती कठीण काम असते. पण गेल्या अनेक वर्षापासून दैनिक कॅलिफोर्निया टाइम्स नियमितपणे सुरू आहे आणि त्याचे हजारो वाचक अगदी देश विदेशात पसरलेले आहेत. स्वतःचा पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळून या माणसाने साहित्य सांस्कृतिक सामाजिक कार्य तसेच धार्मिक कार्य यासाठी स्वतःला झोकून घेतले आहे. मला बहुजन साहित्य संमेलन वरुडला घ्यायचे होते. मी गिरीधर देशमुख यांना सांगितले आणि त्यांनी ते मनावर घेतले .श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सध्याचे अध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार श्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांना त्यांनी स्वागत अध्यक्ष केले. श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. सुधीर पाटील यांना संयोजक केले आणि दोन दिवसाचे एक भव्य दिव्य स्मरणात राहणारे साहित्य संमेलन वरुड च्या इतिहासामध्ये नोंद करून गेले .याचे श्रेय गिरधर भाऊंना द्यावे लागेल .त्यांनी पुढाकार घेतला नसता तर व त्यासाठी त्यांनी स्वतःला तन-मन घराणे झोकून दिले नसते तर ??? जे काम स्वीकारले आहे ते मनापासून करणे हा त्यांचा स्वभाव धर्म आहे आणि म्हणूनच योगाच्या माध्यमातून त्यांनी जी चळवळ वरूडला सुरू केलेली आहे. त्या चळवळीचा पूर्ण परिसरात नावलौकिक आहे .त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची दखल घेतलेली आहे .याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांचा प्रत्यक्ष सत्कार केलेला आहे .कारण त्यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी. आज ७० वर्षाचा माणूस फारसे स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेत नाही. कारण या वयामध्ये धडपड करणे कठीण असते .पण गिरीधर भाऊंनी स्वतः योगासन करून स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवल्यामुळे ते सातत्याने नियमितपणे सामाजिक कार्यासाठी तत्पर राहू शकतात. याही वयामध्ये वरुडच्या नव्हे अमरावतीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने धडपड करणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आणि वरुडच्या या देव माणसाला मी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.

=========== ===

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा