You are currently viewing केंद्र सरकारची आयुष्यमान भव मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ कालावधीत राबविणार

केंद्र सरकारची आयुष्यमान भव मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ कालावधीत राबविणार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची माहिती

 

सिंधुदुर्गनगरी :

 

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी आयुष्यमान भव मोहीम जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि शालेय मुलांची तपासणी आदी उप्रकम राबविले जाणार आहेत. तसेच या मोहिमेत पात्र असून शिल्लक राहिलेल्या ३३२३९ लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरोले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. तसेच १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयुष्मान भव ही महत्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात आयुष्मान आपल्यादारी ३.० अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप केले जाणार आहे.

आयुष्मान सभा अंतर्गत गावपातळीवर आयुष्मान भारत आणि आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, कार्ड काढणे, पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे आदी विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळावा अंतर्गत या कालावधीत आरोग्य वर्धीनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी आरोग्य विषय विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या मोहिमेत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. धुरी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा