You are currently viewing वेस्ट इंडिजने दुसरी सामना सहा गडी राखून जिंकला, मालिका १-१ बरोबरीत

वेस्ट इंडिजने दुसरी सामना सहा गडी राखून जिंकला, मालिका १-१ बरोबरीत

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कॅरेबियन संघाने सहा गडी राखून जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४०.५ षटकांत सर्व गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ३६.४ षटकांत चार गडी गमावून १८२ धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला.

या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघात नव्हते. दोन्ही दिग्गजांना विश्रांती देण्यात आली होती आणि त्यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. याच कारणामुळे भारताला एकदिवसीय विश्वचषकासाठीही पात्र न ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले ज्यांना पात्रता फेरीत झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडसारख्या संघांकडून पराभव पत्करावा लागला होता.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने नाबाद ६३ आणि केसी कार्टीने नाबाद ४८ धावा केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजला भारताविरुद्धच्या शेवटच्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. ईशान किशन आणि शुभमन गिल या जोडीने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट पडू दिली नाही आणि संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची शानदार भागीदारी केली. दरम्यान, ईशानने ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ईशानच्या अर्धशतकानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल गुडाकेश मोतीचा बळी ठरला. त्याने ४९ चेंडूत ३४ धावा केल्या. गिल बाद झाल्यानंतर ईशानही ५५ धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अक्षरही एक धाव काढून बाद झाला. संजू सॅमसनने कर्णधार हार्दिकसह संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. हार्दिक सात धावा करून बाद झाला आणि पुढच्याच षटकात सॅमसनही नऊ धावांवर बाद झाला. यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसानंतर सूर्यकुमार आणि जडेजाने भागीदारी करून आशा उंचावल्या, पण शेफर्डने जडेजाला तंबूमध्ये पाठवले. जडेजाने १० धावा केल्या. जडेजापाठोपाठ सूर्याही २४ धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने १६ धावांचे योगदान दिले, पण भारतीय संघ ४०.५ षटकांत १८१ धावांवर गारद झाला. कुलदीप यादव आठ धावा करून नाबाद राहिला. उमरान मलिक खाते उघडू शकला नाही आणि मुकेश सहा धावा करून बाद झाला. वेस्ट इंडिजने २९व्यांदा भारताला एकदिवसीय सामन्यात २०० पेक्षा कमी धावांवर रोखले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अल्झारी जोसेफने दोन गडी बाद केले. जयडेन सेल्स आणि कारिया यांनी प्रत्येकी एकाला बाद केले.

१८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने आक्रमक सुरुवात केली. काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग यांनी झटपट धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये संघाची धावसंख्या ५० धावांपर्यंत नेली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोघांना बाद करून भारताला सामन्यात परत आणले. मेयर्सने ३६ आणि किंगने १५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला अथांजेही सहा धावा काढून शार्दुलचा बळी ठरला. यानंतर कुलदीपने नऊ धावांवर हेटमायरला बाद करून भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या. तथापि, कर्णधार शाई होपने केसी कार्टीसोबत पाचव्या विकेटसाठी शानदार भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. दरम्यान, होपनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नाबाद ६३ धावांची कर्णधार खेळी खेळली. दुसऱ्या टोकाला केसी कार्टी ४८ धावांवर नाबाद राहिला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून शार्दुलने तीन आणि कुलदीपने एक विकेट घेतली. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना मंगळवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे.

कर्णधार शाई होपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =