You are currently viewing सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भारताचा मंगळवारी कुवैतशी रंगणार अंतिम सामना

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भारताचा मंगळवारी कुवैतशी रंगणार अंतिम सामना

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने पेनल्टी शूटआऊटमध्ये कमाल दाखवल्याने भारतीय फुटबॉल संघाने सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य लढतीत भारताने लेबननवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ०-० (४-२) अशी सरशी साधली. आता मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर कुवैतचे आव्हान असेल.

बंगळुरूतील क्रांतीवीरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात उभय संघांतील खेळाडूंमध्ये कडवे द्वंद्व पाहायला मिळाले. निर्धारीत वेळेसह अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. कर्णधार सुनील छेत्री, अन्वर अली, महेश सिंग व उदांता सिंग यांनी भारतासाठी पेनल्टी घेत गोल नोंदवले. तर लेबननसाठी पहिली किक घेणाऱ्या हसन मौटोकचे प्रयत्न गुरप्रीतने हवेत झेपावत थोपवून धरले. त्यानंतर चौथी किक घेणाऱ्या खलिल बदेरने गोलजाळ्याच्या वरून चेंडू टोलवला व भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अन्य उपांत्य लढतीत कुवैतने बांगलादेशवर १-० अशी मात केली.

भारताने लेबननविरुद्धचे आठपैकी तीन सामने जिंकले असून, त्यांनी आंतरखंडीय चषकाच्या अंतिम फेरीतसुद्धा लेबननला नमवले होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाल्यास बहुतांशी गोलरक्षकाला जबाबदार धरले जाते. मी प्रत्येक पेनल्टीच्या वेळी मनात स्वतःशीच संवाद साधताना प्रतिस्पर्धी खेळाडूच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतो. आता आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. त्यामुळे जेतेपद मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे गुरप्रीत सिंग संधू याने आत्मविश्वासाने सांगितले.

भारत १३व्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तो आठ वेळा चॅम्पियन बनला आहे. संघ चार वेळा उपविजेता ठरला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर नवव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे असेल.

सामना संपल्यानंतर छेत्री म्हणाला, “हा सामना कठीण होता. लेबनॉनविरुद्ध खेळणे सोपे नव्हते. आम्ही चांगले खेळलो. आम्ही सध्या फायनलचा विचार करत नाही. येथून निघाल्यानंतर संघ विश्रांती करेल आणि त्यानंतर अंतिम फेरीची तयारी करेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − three =