You are currently viewing अवखळ श्रावण

अवखळ श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*अवखळ श्रावण*

 

आषाढाच्या धूसर पाऊलखुणा मागे टाकत श्रावण जेव्हा अंगणात येतो तेव्हा निसर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता खुलते..आकाशाच्या निळ्या ओठांवर काळ्या मेघांची हळवी कुजबुज सुरू होते आणि क्षितिजावर पावसाच्या रेशमी पडद्याआड हिरवाईचे स्वप्न आकार घेते. श्रावण म्हणजे केवळ निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू आहे.. मातीच्या कपाळावर उमटलेले पावसाचे कुंकू आहे आणि मनाच्या कोपऱ्यात अलगद जागवणारी आठवणींची सनई आहे म्हणूनच श्रावण आला की मन नकळत म्हणते

‘हा ऋतू आहे की आनंदाची एखादी अवखळ लहर ?’

श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागताच वातावरणात जादू भरते. काळेकुट्ट ढग आकाशात जमू लागतात. क्षणभर सूर्य त्यांच्यामागे लपतो आणि पुढच्याच क्षणी पावसाच्या टपोऱ्या थेंबांची रिमझिम सुरू होते.. ते थेंब जणू आभाळाने पृथ्वीच्या कुशीत पाठवलेली मोत्यांची पत्रेच असतात… कोरड्या मातीवर पहिला पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध चारही दिशांना दरवळतो.. त्या सुगंधात बालपण दडलेले असते, शेतकऱ्याचे स्वप्न असते आणि जगण्याची नवी उमेदही असते.

श्रावणाचा पाऊस कधी शांत, कधी खट्याळ तर कधी धुवांधार असतो.. कधी तो खिडकीच्या काचेवर बोटांनी टपटप वाजवत गुपित सांगतो तर कधी छपरावर ढोल वाजवत बेभान नाचतो… कधी रिमझिम सरींच्या रूपाने तो आकाशातून उतरतो तर कधी मुसळधार धारांनी पृथ्वीला चिंब भिजवून टाकतो.. त्याच्या या लहरी स्वभावामुळेच तो खरा ‘”अवखळ श्रावण’” वाटतो. एखाद्या लहान मुलासारखा तो क्षणात हसतो, क्षणात रडतो आणि पुन्हा क्षणात खळखळून हसवतो.

शेतांच्या बांधावर तर श्रावणाने हिरव्या रंगाची उधळणच केलेली असते… कालपर्यंत उन्हाने करपलेली जमीन आज हिरव्या गालिच्याने नटलेली दिसते… भाताची कोवळी रोपे वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.. ज्वारी-बाजरीची पिके पावसाशी कुजबुजतात.. रानफुलांचे रंगीत ठिपके हिरव्या चादरीवर विखुरलेल्या तारकांसारखे भासतात.. झाडांच्या फांद्यांवर नव्या पालवीचे दागिने चमकतात नी वेली झाडांना बिलगून जणू प्रेमाची मिठीच मारतात.. निसर्गाचा हा साज पाहताना डोळे तृप्त होतात आणि मनाला एक अनामिक शांतता लाभते..

श्रावण म्हणजे पक्ष्यांचाही उत्सव.. पावसाच्या सरींमध्ये भिजत कोकिळेचा मधुर स्वर दूरवर ऐकू येतो.. चिमण्या घरट्याच्या उंबरठ्यावर बसून पावसाकडे कुतूहलाने पाहतात. मोर तर श्रावणाचा जणू राजदूतच..! काळ्या ढगांचे दर्शन होताच तो पिसारा फुलवतो आणि निळ्या-हिरव्या रंगांची इंद्रधनुषी आरास करीत नाचू लागतो.. त्याच्या नृत्यात आनंदाचा उन्माद असतो. त्याला पाहून वाटते की जणू काही पृथ्वीनेच आकाशाच्या प्रेमात पडून नृत्य सुरू केले आहे.

श्रावणाच्या दिवसांना धार्मिक आणि सांस्कृतिक रंगही लाभलेला असतो.. मंदिरांच्या घंटानादाने वातावरण मंगलमय होते… सोमवारी शिवमंदिरांत भक्तांची गर्दी होते. हिरव्या बांगड्यांची खणखण, हातांवरील मेंदीचा सुगंध आणि झुल्यांवरील हास्य यामुळे गावोगावचे वातावरण उत्साहाने भरून जाते. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा सणांनी श्रावण अधिकच रंगतदार होतो.. प्रत्येक सणामागे निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी जोडलेले प्रेमाचे, कृतज्ञतेचे आणि नात्यांचे धागे असतात.

मंगळागौरीच्या रात्री तर गावातील अंगणे जागी होतात. पारंपरिक खेळ, फुगड्या, गाणी आणि हास्य यांच्या लयीने रात्र बहरते. कुठे झोका उंच जातो, कुठे बांगड्यांचा नाद घुमतो तर कुठे आजीच्या जुन्या श्रावणी आठवणी नव्या पिढीच्या कानात अलगद उतरतात.. त्या क्षणी काळ जणू थांबतो आणि भूतकाळ व वर्तमान एकाच झुल्यावर झुलू लागतात..

शहरातला श्रावणही तितकाच मोहक असतो फक्त त्याचे रूप वेगळे असते.. रस्त्यांवर छत्र्यांची रंगीबेरंगी गर्दी दिसते.. पावसाने धुतलेल्या इमारती नव्याने उजळून निघतात.. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून कोसळणाऱ्या सरींकडे पाहण्यात एक विलक्षण आनंद असतो. कांदा भजी, वाफाळता चहा आणि बाहेर बरसणारा पाऊस

या त्रिवेणी संगमाला कोण नकार देईल ?

मात्र श्रावणाचा खरा अर्थ केवळ रोमँटिक पावसात नाही.. या ऋतूमागे शेतकऱ्याच्या आशेची धडधडही आहे. पाऊस वेळेवर पडला तर शेत हिरवेगार होते पाऊस दगा देतो, तर त्या हिरवाईवर काळजीची सावली पडते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक थेंब हा शेतकऱ्यासाठी अमृताचा थेंब असतो. त्याच्या डोळ्यांतल्या आशेचे प्रतिबिंब हिरव्या शिवारात दिसते.

श्रावण हा बाहेरच्या निसर्गाला जितका भिजवतो तितकाच तो मनालाही चिंब करून जातो…

श्रावण संपताना मनाला एक हुरहूर लागते. झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब जणू निरोपाचे अश्रू वाटतात.. आकाश स्वच्छ होते, ढग दूर निघून जातात पण श्रावणाने मनात पेरलेली हिरवाई तशीच राहते.. पावसाचा सुगंध, मोराचा नाच, झुल्याची उंच भरारी, सणांची लगबग आणि ओल्या मातीचा गंध

या साऱ्या आठवणी मनाच्या कप्प्यात कायमच्या साठून राहतात…

असा हा अवखळ श्रावण..! कधी सरींच्या रूपाने हसणारा, कधी ढगांच्या रूपाने रुसणारा, कधी मोराच्या पिसाऱ्यात नाचणारा तर कधी मातीच्या सुगंधातून मनाला स्पर्शणारा. तो निसर्गाचा उत्सव आहे… भावनांचा झरा आहे आणि नवजीवनाची चाहूल आहे म्हणूनच श्रावण आला की मनाच्या आकाशातही काळे ढग दाटतात पण त्या ढगांतून बरसतो तो पाऊस नव्हे तर आनंद, आठवणी आणि जगण्याची नवी हिरवी उमेद.!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा