विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा, विकासाची ‘रेघ’ मोठी करा ; २७ सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण
नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. येथील विकासासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसामुळे केवळ ७ महिने आपल्या हातात मिळतात. यामुळे काहीवेळा निधी अखर्चित राहतो, म्हणूनच कामे लवकर कशी पूर्ण होतील व ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सावंतवाडीकरांना दिलेला शहराच्या विकासाचा शब्द आम्ही पूर्ण करत असून, विरोधकांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि आपली ‘रेघ’ मोठी करून कामे पूर्ण करा, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी येथे केले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानंतर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेतील २७ सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
ते म्हणाले, नगर परिषद निवडणूकीत खासदार नारायण राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शहराचा जुना विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे. यामध्ये माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांचे योगदान मोठे आहे. सध्या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची प्रचंड तळमळ असणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक लाभले आहेत. त्यामुळे शहरासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विकास करायचा आहे. आता नगराध्यक्षा या राजघराण्यातील असल्याने आपल्याला केसेसची कसलीही चिंता राहिलेली नाही, असा मिश्किल उल्लेखही त्यांनी केला.
गुजरात मधील ‘वनतारा’ प्रकल्प आणि तेथील विकास पाहून एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. केवळ गुजरातचे कौतुक करत न बसता आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावात असा जागतिक दर्जाचा प्रकल्प कसा उभारता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जगातील लोकांना आपल्या सावंतवाडीचा हेवा वाटेल असे काम करून मतदारांनी दिलेल्या विश्वासाला व मताला आम्ही पूर्ण न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना ते म्हणाले की, विकासकामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा निधीचे दरवाजे बंद होतील. मतदारांच्या आशीर्वादामुळे सावंतवाडीला आदर्श शहर बनवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. ‘सिंधुरत्न’ योजनेसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामे वेळेत पूर्ण करा आणि पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, लखमराजे भोंसले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, न.प. सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
