You are currently viewing खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर):

येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त फुले विचारांचा जागर करणारे भव्य कविसंमेलन ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील भाषा अनुवादक अधिकारी डॉ. संजय बोरुडे उपस्थित होते.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी श्रीकांत ढेरंगे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम (बापू) घुमटकर होते. यावेळी आदर्श शिक्षक जी. रं. शिंदे, विद्या पं. समिती सदस्य शंकरराव कावडे आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. संजय बोरुडे, श्रीकांत ढेरंगे आणि शांताराम (बापू) घुमटकर यांनी फुले विचारांचे सामाजिक आणि साहित्यिक महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व्यक्त केली.

मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या सुमारे ४० कवींनी प्रबोधनपर कविता सादर करून सभागृहात विचारांचा जागर घडवून आणला. सर्व सहभागी कवींना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याच प्रसंगी शैलेश गायकवाड, विलास बाबर, अलका भवारी, कमल कळमकर आणि डी. के. वडगांवकर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. पुणे येथील विलास बाबर यांना त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेबद्दल ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले काव्यकस्तुरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘काव्य वर्षाविलास’, ‘वर्षाधारा’ हे काव्यसंग्रह आणि ‘विलासचे वैचारिक वैभव’ हा ग्रंथ प्रकाशित असून विविध वर्तमानपत्रांतून ते सातत्याने लेखन करत असल्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.

कवी दत्ता सुकाळे, जी. रं. शिंदे आणि प्रा. स्वाती भोसले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कवी गजानन ऊफाडे आणि रुपाली मेदगे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाने फुले विचारांना काव्यरूपातून अभिवादन करत सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा