*घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’*
बांदा
“एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि निसर्गप्रेमी पद्धतीने साजरा केला. कुणालाही फसवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी घातले, त्यांच्या भोवतालची साफसफाई केली आणि झाडांचे संवर्धन करण्याचा सुंदर संदेश दिला.
उन्हाच्या कडक झळांनी त्रस्त झालेल्या झाडांना विद्यार्थ्यांनी जणू प्रेमाचा थंडावा दिला. छोट्या छोट्या हातांनी झाडांच्या मुळाशी पाणी घालताना, त्यांच्याभोवती साचलेला कचरा हटवताना विद्यार्थ्यांच्या मनातील निसर्गाविषयीची आपुलकी स्पष्टपणे दिसून आली.
“एप्रिल फूल”च्या दिवशी खोड्या करण्यापेक्षा एखादे चांगले काम करूनही आनंद मिळू शकतो, हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात केवळ हिरवळच वाढली नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनातही पर्यावरण संवर्धनाची बीजे रुजली.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून आपल्या जीवनाचा श्वास आहेत. विद्यार्थ्यांनी झाडांची काळजी घेऊन ‘एप्रिल फूल’ला एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वळण दिले आहे. अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये संवेदनशीलता, जबाबदारी आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते.”
या उपक्रमासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांचे तसेच अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविता आणि संजना सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या छोट्याशा पण हृदयस्पर्शी कृतीमुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि प्रसन्न दिसू लागला. “एप्रिल फूल”च्या दिवशी खोड्यांऐवजी झाडांना प्रेम देणाऱ्या या विद्यार्थ्यांनी खर्या अर्थाने निसर्गाशी मैत्री केली.

*“एप्रिल फूल”च्या दिवशी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाडांना केले ‘कूल*’
