वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर
वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का
उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य
वैभववाडी प्रतिनिधी
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यात जल्लोष आहे. तर उबाठा पक्षामध्ये सन्नाटा पसरला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील सदानंद नारकर यांनी वाजत गाजत मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच याच कोळपे मतदारसंघातून प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी भाजपाकडून अधिकृत उमेदवार अर्ज दाखल केला. तसेच भाजपाकडून राजेंद्र राणे, अतुल सरवटे, अनंत फोंडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर जितेंद्र तळेकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी 11 वाजता छाननीला सुरुवात केली. गट क्रमांक 1 कोळपे मतदारसंघाची छाननी सुरुवातीला झाली. यावेळी सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्जात शपथपत्र पूर्ण नसल्याने तो अवैध ठरला आहे. अर्ज अवैद्य ठरताच सुनील नारकर हे तडकाफडकी छाननीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. या निवडणुकीत उबाठासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
