जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पोर्टेबल सेटअप’, १०२ टॉवर्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्कच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक आणि प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला ठोस सूचना दिल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी ‘पोर्टेबल सेटअप’ बसवण्यात आला असून, आता या संपूर्ण परिसरात बीएसएनएल नेटवर्क पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाले आहे.
मुंबईतील बैठकीनंतर प्रत्यक्ष कृती
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ना. नितेश राणे यांनी जिल्ह्यातील विस्कळीत सेवा, रेंजअभावी नागरिकांना होणारी गैरसोय आणि प्रशासनाच्या कामकाजावर होणारा परिणाम ठामपणे मांडला होता. या चर्चेनंतर जिल्ह्यातील १०२ टॉवर्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
१०२ टॉवर्सना वीज जोडणी
यापूर्वी मंजूर झालेले १०२ टॉवर्स केवळ सौरऊर्जेवर अवलंबून असल्याने पावसाळा व ढगाळ वातावरणात वारंवार बंद पडत होते. ही अडचण दूर करण्यासाठी महावितरण आणि बीएसएनएल यांच्यात समन्वय साधत या टॉवर्सना वीज जोडणी देण्यात आली. आता सौरऊर्जा व महावितरण या दुहेरी व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील नेटवर्कची स्थिरता आणि ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
३१ नव्या टॉवर्सना मंजुरी
रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यासाठी ३१ नवीन बीएसएनएल टॉवर्स मंजूर करण्यात आले आहेत. या मंजुरीमुळे दुर्गम भागातील दळणवळण आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.
दरम्यान, कायमस्वरूपी टॉवर उभारणीसाठी लागणारा निविदा कालावधी लक्षात घेता तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित करण्यात आला असून, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
