You are currently viewing सृजनवाटा समजून घेताना…

सृजनवाटा समजून घेताना…

*सृजनवाटा समजून घेताना…*

*आनंदयात्रीचा नवोदिताना घडविणारा अभिनव उपक्रम.*

आनंदयात्री वाड़्मय मंडळ वेंगुर्ला हे रसिकांसाठी व साहित्यप्रेमींसाठी ‘ सृजनवाटा समजून घेताना’ हा सिंधुदुर्गातील दिवंगत साहित्यिकांच्या साहित्याची ओळख करून देणारा दीर्घकाळ चालणारा अभिनव उपक्रम सुरू करीत आहे. आनंदयात्री वाड़्मय मंडळाच्या अध्यक्षा लेखिका वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून व सर्व आनंदयात्रींच्या सहकार्यातून नेहमीच कल्पक व दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम रसिकांसाठी ठेवले जातात.
आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नांची खाण आहे. साहित्य क्षेत्राला या जिलाह्याने अनेक रत्ने दिली आहेत. आपल्या तेजस्वी कलाकृतींचे अलंकार साहित्य शारदेच्या अंगावर चढवून तिला समृद्ध करणारे अनेक साहित्यिक आपल्या जिल्ह्यात होऊन गेले.
आज मानवी जीवन ढवळून निघते आहे. औद्योगिक व डिजिटल युगात क्रांती घडत आहे. नवनवीन विचारांचे वादळ मानवी जीवनाला तळापासून घुसळून काढत आहे. अशावेळी अनेक आव्हाने, ताण,तणाव याना सामोरे जावे लागत असताना माणूस साहित्य कला यापासून दूर जात आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आयुष्यात साहित्य , कला या गोष्टी आवश्यक आहेत. अन्न माणसाची पोटाची भूक भागवेल. पण माणसाची बौद्धिक व मानसिक भूकही असते ती पुस्तकेच भागवतात. यासाठी आजच्या काळात वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर येणारा भविष्य काळ आपल्याला क्षमा करणार नाही.
वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आनंदयात्री वाड़्मय मंडळाने ‘ सृजनवाटा समजून घेताना ‘ हा दीर्घ काळ चालणारा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण असे कार्यक्रम घेतले जातील. सर्वानी महिनाभरात त्या साहित्यिकाचे जमेल तेवढे जास्तीत जास्त साहित्य वाचायचे. प्रत्येकाने त्या साहित्यिकावर आपले पाच मिनिटांचे विचार मांडण्यासाठी भाषण तयार करावयाचे. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्यावेळी चर्चेत सहभागी व्हावयाचे.ग्रूपवर त्यांच्या साहित्यावर लेख लिहावयाचे. कार्यक्रमाच्या वेळी एक कोणीतरी वक्त्याने तयारी करून पंचवीस ते तीस मिनिटे बोलावयाचे. यासाठी इच्छुकाना संधी दिली जाईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकानी निर्माण केलेल्या साहित्यकृती, त्यामधून घडवलेले जीवनदर्शन, त्यातून सांगितलेले तत्त्व, त्यातील जीवननिष्ठा, जीवंत जीवनानुभवांचे लसलसते दर्शन इत्यादी अनेक पुस्तकातून बंदिस्त असलेली मूल्ये समोर ठेवली जातील. यासाठी अभिवाचन, भाषण, सादरीकरण, नाट्याभिनय लेखन , चर्चा, परिसंवाद इत्यादी विविध मार्गानी साहित्य लोकांसमोर ठेवले जाईल. साहित्यिकांच्या साहित्याची सूची समोर ठेवली जाईल. साहित्यनिर्मितीची साहित्यिकाची मूळ प्रेरणा, वैशिष्ट्ये, शैली, जीवनदृष्टी अशा विविध अंगानी अभ्यास केला जाईल.
सिंधुदुर्गातील समृद्ध निसरागानै साहित्यिकाना लिहिते केले. या इथल्या मातीने त्याना लळा लावला. म्हणूनच वसंत सावंत म्हणून जातात ” अशा लाल मातीत जन्मास यावे ” सिंधुदुर्गातील साहित्यिकांच्या साहित्यात अपरिहार्यपणे येथील निसर्ग, भव्य व आकर्षक समुद्र किनारे, उसळत्या लाटा, इथला समृद्ध निसर्ग, इथली संपन्न संस्कृती , इथली माती, या मातीतील माणूस, इथल्या चालिरिती, समाज वगैरे सर्व गोष्टी चे विलोभनीय दर्शन साहित्यिकांच्या साहित्यात आले आहे. त्याचे दर्शन रसिकाना व पुढील पिढीला या उपक्रमाद्वारे करून दिले जाईल.
‘ सृजनवाटा समजून घेताना ‘ या उपक्रमाचा शुभारंभ कै. श्रीपाद काळे यांच्या स्मृतीदिनी अठरा जून रोजी त्यांच्या साहित्यावरील कार्यक्रमाने होतो आहे. कै. श्रीपाद काळे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन करून त्यांच्या साहित्यावर अभिवाचन , भाषणे असा कार्यक्रम होईल. यातूनच दीर्घकालीन चालणार्या उपक्रमाचा शुभारंभ केला जाईल. शुभारंभाच्या कार्यक्रमाचे उद्- घाटक बांधकाम व्यावसायिकांना सचिन वालावलकर हे असतील. प्रमुख पाहुणे तरूणभारत आवृत्तीचे प्रमुख शेखर सामंत व अभिनेते दिग्दर्शक संजय पुनाळेकर उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी अजित राऊळ असतील.
तरी रसिकानी , साहित्यप्रेमीनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आनंदयात्रीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा