You are currently viewing मुंबईच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्स आयपीएलमधून बाहेर; आरसीबीसमोर कठीण समीकरण

मुंबईच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्स आयपीएलमधून बाहेर; आरसीबीसमोर कठीण समीकरण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ६९ व्या सामन्यात मुंबई इंडिअन्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये परतले आहेत. मुंबईचे १४ सामन्यांत १६ गुण आहेत. त्यांच्या सनरायझर्सवरच्या विजयाने राजस्थान रॉयल्सला स्पर्धेतून बाहेर फेकले आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दबाव वाढला आहे.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकत मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता आरसीबीकडे गुजरातविरुद्ध विजयाशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचे १४ सामन्यांतून केवळ १४ गुण आहेत. सनरायझर्सविरुद्ध मुंबई हरेल, अशी ती प्रार्थना करत होती. असे झाले असते तर राजस्थानच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. त्यांचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई तसेच आरसीबीचा पराभव आवश्यक होता, पण मुंबईच्या विजयाने त्यांच्या आशा आधीच संपुष्टात आल्या.

आजच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने पाच गडी गमावून २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २ गडी गमावून २०१ धावा केल्या आणि १८ षटकांत सामना जिंकला. हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ८३ धावा केल्या. विव्रत शर्मानेही ६९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहितनेही ५६ धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली. त्याचवेळी हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कॅमेरून ग्रीनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

*आरसीबीसमोर समीकरण काय आहे?*

> गुजरातविरुद्धचा सामना हरला किंवा रद्द झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही.

> जर आरसीबी संघ हा सामना हरला तर त्याचे १४ सामन्यांमध्ये फक्त १४ गुण राहतील.

> गुजरातविरुद्धचा सामना रद्द झाल्यास त्याला एक गुण मिळेल आणि त्याला १४ सामन्यांत केवळ १५ गुण मिळू शकतील.

> जर आरसीबीच्या संघाने गुजरातला हरवले तर त्याचे १४ सामन्यांत १६ गुण होतील.

> आरसीबीचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत, जर आरसीबीचा संघ जिंकला तर चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पोहोचेल.

> आरसीबीच्या विजयानंतर मुंबईचा संघ पाचव्या स्थानावर घसरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा