You are currently viewing आरोस येथे वणव्यात ४० ते ५० एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक

आरोस येथे वणव्यात ४० ते ५० एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक

अडीज हजार काजू कलमे व पंधराशे आंबा कलमे भस्मसात

कोट्यावधी रुपयांचे नुकसान : तत्काळ पंचानामा करण्याची मागणी

सावंतवाडी

उन्हाळा सुरु झाल्यानंतर वणव्यांचे सत्र सुरुच असून शुक्रवारी आरोस कळंगुटकरवाडी येथे सुमारे ४० ते ५० एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे २५०० काजू कलमे व १५०० आंबा कलमे भस्मसात झाल्याने सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू व आंबा हंगामात शेतकऱ्यांचा आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आगीमुळे झालेल्या या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
आरोस कळंगुटकरवाडी येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून आंबा काजू बागायती तयार केल्या होत्या. चार-पाच वर्षे वावरल्याने उत्पन्न देणारी काजू कलमे आशादायी ठरली होती. परंतु अचानक लागलेल्या आगीत सर्व कलमे जळून खाक झाली. त्यामुळे डोळ्यादेखत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. परंतु दुपारची वेळ असल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. तरीसुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवल्याने ग्रामस्थांना यश आले व आग काही प्रमाणात आटोक्यात आली. या आगीत ४० ते ५० एकरवरील काजू बागायती व आंबा बागायती जळाल्याने आमचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या वणव्यात उदय कुबल, झिलू कुबल, कृष्णा कुबल, सखाराम सावंत, दत्तगुरु दळवी, रामचंद्र कासले, राजाराम दळवी, गुंडू कळंगुटकर, दत्तगुरु कुबल, बाबुराव कळंगुटकर, विलास कळंगुटकर, रमाकांत कळंगुटकर, भिवनेश कळंगुटकर, नर्मदा कोरगावकर, भरत कळंगुटकर, सावित्री कळंगुटकर, सिताराम कळंगुटकर, पांडुरंग कळंगुटकर, सुभाष कळंगुटकर, नामदेव कळंगुटकर, मोहन कळंगुटकर, अनिल कळंगुटकर, गजानन नाईक, शांताराम कुबल आदी शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या.
दरम्यान, आरोस सरपंच शंकर नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता सुमारे पन्नास एकरवर लागलेल्या आगीत आपल्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पंचनामा करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, बुधवारी लागलेल्या या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही .

प्रतिक्रिया व्यक्त करा