You are currently viewing स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयकपदी सुभाष दळवी यांची निवड

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयकपदी सुभाष दळवी यांची निवड

सावंतवाडी :

 

विलवडे गावचे सुपुत्र तथा मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुभाष दळवी यांचे लोकसहभागातून ‘धारावी स्वच्छतेचे मॉडेल’ सर्वांनाच परिचित आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठीचे निर्माल्य कलश आणि निर्माल्य व्यवस्थापन, होम कंपोस्ट, कचरा वर्गीकरण, वस्ती पातळीवर कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑरगॅनिक फार्मिंग’, प्लास्टिक पिशव्यांचा मोह टाळा, तसेच मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दत्तक वस्ती योजना सारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजना त्यांच्या संकल्पनेतूनच तयार झाल्या आहेत. स्वच्छता व पर्यावरण संतुलनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. हे योगदान लक्षात घेऊनच त्यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माहिती, शिक्षण, प्रचार व प्रसिद्धी तसेच क्षमता बांधणीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता सुभाष दळवी यांची या प्रकल्पाच्या राज्य समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष दळवी हे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांचे भाऊ आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा