You are currently viewing वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ फेब्रुवारीला ‘तोंड बंद’ आंदोलन…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ फेब्रुवारीला ‘तोंड बंद’ आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘तोंड बंद आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आत्मक्लेश आंदोलनात कोणाचीही भाषणे होणार नसून सर्व आंदोलक शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांनी या अभिनव आंदोलनाला पाठिंबा दिला असुन त्यांच्या सहभागाने हे आंदोलन होणार आहे.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकशाहीप्रेमी कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची एक बैठक काल ओरोस येथे पार पडली. या बैठकीमध्ये पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खुनाबद्दल, पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल आणि समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवर चिंता व्यक्त करण्यात आली. ॲड. संदीप निंबाळकर यांच्या पुढाकाराने बोलाविण्यात आलेल्या या बैठकीला ॲड. देवदत्त परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, सौ. मंगला परुळेकर, ॲड. मनोज रावराणे, सतीश लळीत, अजय कांडर, विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, श्री. नामानंद मोडक, महेश परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, सुनील पाटील, प्रा. विनोदसिंह पाटील, प्रदीप मांजरेकर, भगवान शेलटे, पी. एल. कदम, दौलतअली पटेल, परमेश्वर सावळे आदि उपस्थित होते.

या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधातील बातम्या सातत्याने प्रसिद्ध केल्यामुळे आणि एक विशिष्ट भूमिका घेतल्यामुळे मूळ कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्यात आले. अतिशय अमानुषपणे एका निर्भीड पत्रकाराला क्रूरपणे संपविण्यात आले. मात्र या अघोरी कृत्याबाबत समाजातून आवश्यक त्या प्रमाणात निषेधाचा सूर उमटला नाही. काही पत्रकार संघटना, राजकीय पक्ष यांनी या खुनाबद्दल निषेध नोंदवून आंदोलने केली. परंतु दिवसाढवळ्या एका पत्रकाराचा खून होतो आणि त्याची अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया समाजात उमटली नाही. यामुळे समाज आपल्या संवेदना हरपत चालला आहे की काय, अशी शंका यावी, असे चित्र निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन अशा हिंसक आणि लोकशाहीविरोधी, घटनेच्या तत्वांची पायमल्ली करणाऱ्या घटनांबाबत समाजाने एक निश्चित भूमिका घेऊन उभे राहिले पाहिजे, हे मांडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या अभिनव ‘तोंड बंद’ आंदोलनात कोणाचीही भाषणे होणार नाहीत. सकाळी साडेदहा वाजता ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल. त्यानंतर तोंडाला काळी पट्टी बांधून सर्व आंदोलक त्या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत मूकपणे थांबतील. याठिकाणी आंदोलकांची भूमिका स्पष्ट करणारा एक फलक लावण्यात येईल. भुमिका स्पष्ट करणारी पत्रके वाटण्यात येतील. एक वाजता राष्ट्रगीत गायल्यानंतर आंदोलन संपेल. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील संविधानप्रेमी, लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व शक्यतो पांढरे कपडे घालून, सोबत काळी फित घेऊन यावे, असे आवाहन ‘ आम्ही सारे भारतीय’ या लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या मंचाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 14 =