You are currently viewing सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे राजवाड्यात २६ रोजी प्रतापगडाचा रणसंग्राम शिव व्याख्यानाचे आयोजन

सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे राजवाड्यात २६ रोजी प्रतापगडाचा रणसंग्राम शिव व्याख्यानाचे आयोजन

सावंतवाडी

येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.

आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तोरणा, राजगड, रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, विशाळगड, सिंधुदुर्ग यासह जिंजी पावेतो कित्येक गड व किल्ले यांचा समावेश आहे.
गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेत प्रतापगडाचे महत्व काकणभर सरसच म्हणावे लागेल. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात महाराजांनी या गडावर अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. लोखंडी पहारही वाकवण्याची ताकद असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजल खानाचा पराभवही महाराजांनी याच गडावर धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर केला.
अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. त्यामुळे इतिहासातील ‘सर्वोत्कृष्ट युध्द’ असे बिरुद असलेल्या या रणसंग्रामातील बारकावे ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी शिवजागराचे… रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे असे ५ पुष्प सादर करण्यात आले. याला आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ६ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या
सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरेल, अशी आशा आहे.

डॉ शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. यात हजारो शिवभक्त सहभागी होतात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा