You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सवास प्रारंभ

कणकवली पर्यटन महोत्सवास प्रारंभ

इथल्‍या तरूणांचे मुंबई व इतर शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबाविण्यासाठी प्रयत्‍न – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कणकवली :

 

कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा प्रारंभ आज उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत, रोटरी क्लबचे गौरीश धोंड आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्‍हा झाला आणि इथल्‍या पर्यटन विकासाला चालना मिळाली. त्‍या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले. आता इथल्‍या तरूणांचे मुंबई व इतर शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आम्‍ही त्‍यासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्‍वाही ही चव्हाण यांनी आज येथे दिली.

तसेच आगामी काळातही जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती सक्षम व्हावा, इथे उद्योजक व्हावे शेतकऱ्यांना पूरक उद्योगधंदे करता यावेत. इथल्या तरुणांची स्थलांतर थांबावे. यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या कलांना आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाली आहेत. तसेच कला संस्कृती जपली जात आहे. कणकवलीवासीयांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हा चांगला उपक्रम समीर नलावडे आणि त्यांचे सहकार्यातून राबवला जात आहे अशी प्रतिक्रिया ही पालकमंत्री यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोना कालावधीत आपल्या जिवाची परवा न करता सेवा बजावणाऱ्या अशोक राणे, अरुण जोगळे, उत्तम पुजारे, निनाद पारकर, अमित टकले, डॉ. सुहास पावसकर, शिवाजी परब, डॉ. संजय पोळ, अधिपरिचारिका नैना मुसळे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, विशाल मेस्त्री, सविता आश्रमचे संदीप परब आदींचा सत्कार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा