You are currently viewing ‘विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील’ – मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस यांना टोमणा!!!

‘विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील’ – मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस यांना टोमणा!!!

 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: परतीच्या पावसाने  हाहा:कार माजवला आहे. एकीकडे राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही,” असं त्यांनी जाहीर केलं. “परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही,” असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. याचदरम्यान  त्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

केंद्राची वाट न पाहता राज्याने तातडीने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहारला जातच आहेत. केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नाही.” तसंच या विषयात राजकारण करुन नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. “सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं संकट आहे तर सोबत काम करुन केंद्राची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी चार लाख रुपयांच्या धनादेशाचं मुख्यमंत्र्यांच्या वाटप यावेळी करण्यात. अतिवृष्टीमुळे सर्वाधित जीवितहानी सोलापूर जिल्ह्यात झाली. सोलापुरातील विविध तालुक्यातील दहा मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली. यामध्ये पंढरपुरातील चार, माढ्यातील तीन आणि दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील प्रत्येकी एक मृताच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

 

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी करत सरकारने जबाबदारी झटकू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.”

 

“पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. पूरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. नुकसानग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी मी आलो आहे. संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पंचनामे सुरु आहे. पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत केली जाईल. कोणीही काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं कारण नाही. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देता आहे. त्यामुळे सावध राहा, प्राणहानी होऊ देऊ नका,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =