You are currently viewing पर्यटन व्यावसायिक संकटात असताना पालकमंत्र्यांना भेट देण्यासाठी वेळ नाही- अतुल काळसेकर

पर्यटन व्यावसायिक संकटात असताना पालकमंत्र्यांना भेट देण्यासाठी वेळ नाही- अतुल काळसेकर

पालकमंत्री केवळ मंत्रीपद टिकवण्यासाठी जिल्ह्याचे दौरे करत आहेत.

पर्यटन व्यवसायिकांच्या मागण्यांसाठी भाजपा आंदोलन छेडणार..

कणकवली

देशातील पहिला आणि महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा असे बिरुद मिरवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच, ऍग्रो, हिस्टॉरीक, कल्चरल, फूड व अँडव्हेंचर टुरिझम मध्ये टुरिझम क्लस्टर च्या माध्यमातून शाश्वत विकास होऊन जिल्ह्यातील पर्यटन बहरु शकते. परंतु हे सरकार या मुलभुत गोष्टीकडे केव्हा लक्ष देणार? पालकमंत्री उदय सामंत हे केवळ आपले मंत्रीपद ठिकवण्यासाठी जिल्हा दौरा करत आहेत.पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्याकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास भाजपातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी दिला आहे.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनापासुन पर्यटन व्यावसायीकांनी आपल्या हॉटेलच्या बाहेर लाल झेंडा लावून आंदोलन सुरु केले आहे.पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत,त्यांनी या कृतीतून सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच पर्यटन व्यावसायिकांचे सध्या पोस्टकार्ड आंदोलन चालू आहे. ज्यामध्ये लाल शाईने पर्यटन व्यावसाईक आपल्या समस्या लिहुन सरकारला पाठवून देत आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करत आहेत. आम्ही त्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत आहोत, भविष्यात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा अतुल काळसेकर यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गात पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यानी पर्यटन व्यावसाईकांना बोलावून तीन-साडेतीन तास जिल्हा नियोजन सभागृहाच्या बाहेर ताटकळत ठेवले.शेवटी प्रत्यक्ष भेट न देताच केवळ पर्यटन मंत्री यांच्याशी येणाऱ्या काळात ऑनलाईन मिटिंग करु असे सांगून निघून गेले.हा जिल्हयात पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसाईकांचा घोर अपमान आहे, अशी टिका अतुल काळसेकर यांनी केली.
गेल्या दिवाळीमध्ये क्यार वादळ, डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिती व गेले सहा महिने कोरोना लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे, हॉटेल लॉजिग, बोटींग, वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट व्यावसायिक यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे? हा यक्ष प्रश्न या व्यावसाईकांना भेडसावत आहेत.एकमेव पर्यटन जिल्हा असलेला आपला सिंधुदुर्ग आणि येथील स्थानिक व्यावसाईकांनी सरकारी मदत किंवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करन पर्यटन क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. त्यांच्या समस्यांकडे पालकमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे दुर्भाग्य असल्याचा टोला अतुल काळसेकर यांनी लगावला.
खऱ्या अर्थाने पर्यटन विषयासाठी आमचे सरकार असताना काम झाले होते. वॉटर स्पोर्ट पॉलिसी, किनारपट्टीवर राहणाऱ्या सी.आर.झेडमध्ये बाधित असूनही सरकारने घर नंबर देण्यासाठी काढलेला अध्यादेश,आणि पर्यटन पॉलीसीत आवश्यक बदल केले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिल्हयाचा पर्यटन विकास होण्यासाठी पर्यटन संचनालयाची निर्मिती भाजपा सरकारने केली होती. पण पर्यटन व्यावसाईकांचे दुर्दैव हे की ज्या ठाकरे घराण्याकडे मुख्यमंत्री पद आहे, त्याच घराण्याकडे राज्याच्या पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.त्याच्याकडूनच पर्यटन विकासाठी अत्यावश्यक असलेले पर्यटन संचालक हे पद रिक्त ठेवले आहे.हे सरकार राज्याच्या पर्यटन वाढीस काय काम करणार? असा सवाल अतुल काळसेकर यांनी केला.
व्यावसायिकांनी घेतलेली बँकांची कर्जे, त्याचे थकीत हप्ते, वाढलेले व्याज, बँकेची ते भरण्यासाठीची सक्ती, रिसॉर्टच्या कामगारांचा पगार प्रश्न, भाड्याने चालवायला घेतलेलं हॉटेल, त्यांची भाडी, डिपॉजिट समस्या, बंद काळातील वाढीव वीज बिले, चुकीच्या सी.आर.झेड जनसुनावणीमुळे निर्माण झालेल्या अडचणी सोबत सध्या पर्यटन व्यवसाय सुरु कले आहेत, तरी अजून पर्यटक नाहीत, बंद काळातील नुकसानीची भरपाई या व अशा अनेक समस्यांवर सरकार पर्यटन व्यावसाईकांसोबत केव्हा चर्चा करणार आहे?
राज्याचे आणि पक्षाचे प्रमुख असलेल्या ठाकरे घराण्यात हे खाते असल्यामुळे पालकमंत्र्यासह सर्वांची बहुदा ही अगतिकता आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून पर्यटन व्यावसाईकांच्या प्रलंबित असलेल्या सर्व प्रश्नांसाठी,त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा आत्मनिर्भर संयोजक अतुल काळसेकर यांनी दिला आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 5 =