You are currently viewing शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित, खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती व्हावी…

शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित, खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती व्हावी…

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ ; बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

मालवण

कोकणच्या शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित व खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती व्हावी, अशी मागणी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या व तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकांऱ्यानी श्री. चव्हाण हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी कोकणात पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण व शहरी पर्यटन स्थळावर पोहचण्यासाठी खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती होण्यासंबंधी कार्यवाही व्हावी अशी विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात आली. मागील सरकारच्या काळात बंदर विकास मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणात नव्याने बंदरजेटींची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी नव्याने उभारण्यात आलेली जेटी अशा प्रकारच्या अनेक जेटीमुळे कोकणात सुरक्षित जलपर्यटन होण्यास मदत झाली आहे. कोकणातील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे बहुचर्चित मुंबई- गोवा महामार्ग तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक रस्त्यांचे जाळे कोकणात निर्माण होईल तसेच सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला, अशी माहिती महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.

यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहर अध्यक्ष मंगेश जावकर, मालवण वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष किसन मांजरेकर, टी. टी डी. एस अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − two =