You are currently viewing रक्षाबंधन….रुजवात संस्कारांची.

रक्षाबंधन….रुजवात संस्कारांची.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा रक्षाबंधनाच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम ललित लेख*

*रक्षाबंधन….*
*रुजवात संस्कारांची….*

रक्षाबंधन….श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी येणारा हिंदू धर्मातील भाऊ-बहीण या पवित्र नात्याला रेशमाच्या धाग्यांनी निस्वार्थी प्रेमाच्या, विश्वासाच्या अतूट, गोड बंधनात बांधणारा सण…उत्सव..!
*एक धागा प्रेमाचा आपल्या गोड नात्याचा*
*आवडतो मजला हा नाजूक बंध रेशमाचा*
असं म्हणत भाऊ बहिणीकडून भावावरील अतूट विश्वासाचा, प्रेमाचा रेशीम धागा आपल्या मनगटावर बांधून घेतो… बहिणीच्या नाजूक हातांनी बांधलेलं रक्षणाच्या वचनाचं बंधन भाऊ मिरवत असतो…ही नात्यांची रेशमी वीण जपण्याचा देखील प्रयत्न करतो…
*मिरवत असतो सदा मी…तू बांधलेली राखी…*
*बहीण भावाचं नातं तरी…तूच असतेस सखी…*
बालपणापासून बहीण हीच भावाची सखी असते…आई-वडिलांना न सांगू शकणारं मनातील सर्वकाही भाऊ बहिणीला सांगतो… आई-वडिलांच्या मधील बहीण जणू दुवाच असते…
रक्षाबंधन …भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील पावित्र्य आणि निस्पृहता जपली आहे, गोडवे गायले आहेत. आपली रक्षा करण्यासाठी बहिणीने भावाला विश्वासाने, प्रेमाने बांधलेले बंधन आहे. इतिहासात डोकावून पाहिले असता, चित्तोडची राणी कर्णावतीने बहाद्दूरशहा जाफर पासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मोघल सम्राट हुमायून ला राखी पाठवली होती आणि चित्तोडचे रक्षण करण्याची विनंती केली होती…हुमायून ने बहाद्दूरशहा जाफर बरोबर युद्ध करून चित्तोडचे रक्षण केल्याचा इतिहास आहे. पौराणिक कथेमध्ये श्रीकृष्णाच्या जखमी बोटावर द्रौपदी आपली साडी फाडून साडीचा तुकडा बांधला होता, तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला सर्व संकटातून वाचविण्याचे वचन दिले होते.
*सर्व सुखं तुझ्यासाठी…घेतली मी ओंजळीत…*
*औंक्षण करता दिव्यांनी देईन तुज ओवाळणीत…*
आपल्या बहिणीच्या सुखासाठी आपली सुखाने भरलेली ओंजळ भाऊ ओवाळणी म्हणून बहिणीसाठी रीती करतो. भावा बहिणीचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा प्रेमाने भारलेले असते…ते एकमेकांची काळजी घेते…भाऊ बहीण नात्याची तुलना कशाशीही होणार नाही, ते अतुलनीय आहे. जरी छोट्या छोट्या कारणांसाठी भांडले तरी…एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार असतात…. *हट्ट तुझे माझ्याकडेच…हक्क तुला भांडण्याचा…* म्हणत भाऊ आपल्या लाडक्या बहिणीचे सर्व हट्ट पुरवतो…बहिणीच्या डोळ्यातील आसवे आपल्या अधरांनी पिऊन टाकतो…तिच्या सुखाची स्वप्ने पापण्यांवर घेतो…दुःखांना आपल्या झोळीत घेत सुखाची ओंजळ तिच्या पदरात घालतो…

*सासरी तू जाता कमी तुझीच या हृदयी उरे…*
*वाटते तुज सांगावे सासरचे हे बहाणे पुरे…*
बहीण लग्न करून सासरी गेल्यावर स्वतःच्या मनाची अशीच समज काढतो… *निरोप घेता माहेराचा, विसर न पडो भावाचा…आवडतो मजला हा, नाजूक बंध रेशमाचा…* रेशमाची राखी ही बहीण भावाच्या एकमेकांवरील अतूट विश्वास अन् प्रेमाची प्रतीक होय…!
भारतीय संस्कृतीत मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन होते. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी भारतीय संस्कृती आहे.
*यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:*
जिथे स्त्रियांचा सन्मान, पूजा केली जाते तिथे देवाचा वास असतो. स्त्रीकडे भोग वस्तू म्हणून न पाहता आईच्या भावनेतून पवित्र दृष्टीने पाहण्याची गरज आहे. बहिणीने भावाला राखी बांधताना आपल्या प्रमाणेच प्रत्येक स्त्रीबद्दल आदर दाखविण्याचे वचन घेतल्यास समाज घाणेरड्या गुणांपासून मुक्तीकडे वळू लागेल. रक्षाबंधन हे देणे घेणे अशा व्यवहाराचा सण नसून वचन घेण्याचा पवित्र सण आहे. हा उत्सव खऱ्या अर्थाने समाजात महिलांविषयी आदर आणि संरक्षणाची भावना वाढीस लागण्यासाठी तयार केलेला आहे. आज पुरातन भारतीय संस्कृती विसरून समाज अधोगतिकडे जाताना दिसत आहे, सणाचा देखील बाजार मांडला जात आहे. हा सण आपल्या मूळ उद्देशापासून, अस्तित्वापासून दूर जात आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न समाजात उभा राहत आहे. त्यामुळे या उत्सवाचा खरा अर्थ समजून घेण्याची आणि लोकांना समजविण्याच्या गरज निर्माण झाली आहे.
भारतात प्रत्येक स्त्रीला माता-भगिनींचा दर्जा दिला जातो. रक्षाबंधन या नात्यांना मजबुती देण्याचा, घट्ट करण्याचा उत्सव आहे. आपली पत्नी वगळता सर्व स्त्रिया भगिणीसमान आहेत….अशी भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी वडिलांना सुद्धा राखी बांधू शकते… ही शिकवण भारतीय संस्कृतीचा पाया आहे. सख्ख्या भावालाच नव्हे तर शेजारी, नातेवाईक, शाळा, महाविद्यालयातील मित्र, यांना देखील बहीण राखी बांधते…त्यामुळे बंधुत्व भाव वाढीस लागतो. आपल्याच धर्मातील नव्हे तर इतर धर्मातील बंधू, मित्र इत्यादींना राखी बांधल्याने धार्मिक सलोखा राखला जातो. एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा वाढीस लागतो. मनाची शुद्धता आणि सामाजिक पावित्र्यता जपणे हा सणाचा गाभा आहे.

*बांधा मनगटी राखीला*
*जपा भावना सणाला*
*वाचवा गर्भात चिमुकलीला*
*जगवा लाडक्या मुलीला*
*संकटात वाचवा पोरीला*
*द्या सन्मान प्रत्येक स्त्रीला*
समाजात होत असलेल्या स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ स्त्रीला सक्षम करून भागणार नसून त्यासाठी समाज परिवर्तन, तरुण मुलांमधील विचारांचे परिवर्तन, इंटरनेट, सोशल मीडियावरून होणारे चुकीचे संस्कार बदलून मुलांमध्ये वैचारिक प्रबोधन होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये, तरुणांमध्ये स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी संस्कारक्षम दृष्टीकोनाची जाणीव निर्माण केली पाहिजे. मुले शक्यतो जे पाहतात तेच आचरणात आणतात…घरातील आई वडिलांच्या व्यवहाराचा, वागण्याचा सर्वात जास्त प्रभाव मुलांवर पडतो. त्यामुळे घरातील मोठ्यांनी आपली वागणूक संस्कारक्षम ठेवली… तर मुले तसाच आदर्श घेतील. मुलींच्या जन्माचा सुद्धा उत्सव साजरा झाला पाहिजे, आणि तो प्रत्येक पालकाने केला पाहिजे. मुलांवर संस्काराचे दुसरे महत्त्वाचे केंद्र म्हणजे शाळा…शाळेतूनच मुलांवर स्त्रियांविषयीच्या स्नेहभाव, आदरभाव, स्त्री-पुरुष समानता बाबत योग्य संस्कार केले….चांगल्या संस्काराची बीजे पेरली तर भविष्यात रुजून येणारी, वाढणारी रोपे निर्मळ मनाची सुयोग्य विचारांची आणि निरोगी भावनांची येतील….!
*बीज अंकुरे विचारांचे..*
*संस्काराच्या मातीत..*
*राखू पावित्र्य नात्यांचे..*
*जपुनी भावना हृदयात..*

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा