You are currently viewing बांदा व्ही. एन नाबर प्रशाळेत जागतिक कौशल्य दिन साजरा…

बांदा व्ही. एन नाबर प्रशाळेत जागतिक कौशल्य दिन साजरा…

बांदा

कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण, २१ व्या शतकातील युवकांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे कौशल्य आहे. कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता ही स्वतःला मिळालेली एक देणगी आहे. ज्यामध्ये अनुभवामुळे वाढ होत जाते असे मत उद्योजक बाबा काणेकर यांनी येथे जागतिक कौशल्य दिनाच्या कार्यक्रम बोलताना व्यक्त केले.

येथील व्ही. एन नाबर इंग्लिश मिडीयम प्रशाळेत आयोजित कार्यक्रमात श्री काणेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक नारायण पित्रे, उद्योजक भाऊ वळंजु, उद्योजक सिद्धेश पावसकर, प्रशाळेच्या मुख्याध्यापीका सौ. मनाली देसाई एम. एस. एफ. सी. विभाग प्रमुख सौ. रीना मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
श्री काणेकर बोलताना पुढे म्हणाले, कौशल्य हा असा खजिना आहे जो कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कौशल्य म्हणजे आत्मनिर्भरता आहे. कौशल्य मुलांना रोजगार बनवत नाही तर स्वयंरोजगारक्षम बनवते. उद्योजक बनवण्यासाठी व आपलं नाव मिळवण्यासाठी शिक्षणाची कोणती अट नसून स्वतःच्या कौशल्यावर आपण मोठे होऊ शकतो. आपल्या प्रशाळेमध्ये एम.एस.एफ.सी. सारखा अभ्यासक्रम सुरू असून या माध्यमातून तुमच्या स्वतःच्या बुद्धीने तुमच्या हाताच्या सामर्थ्याने कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला समृद्ध करू शकता.
सौ. श्वैता कोरगावकर म्हणाल्या कि, आपल्या प्रशाळेमध्ये एम.एस. एफ. सी. सारखा विषय एक कौशल्य विषय असून मुलांना याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. आजचे जग हे तंत्रज्ञान युगातील जग असल्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेऊन बाहेर गेलेल्या मुलांना इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेताना या विषयाचा मोठा उपयोग होत आहे. तसेच हा विषय सरासरी गुणांसाठी खूप चांगला असून विद्यार्थ्यांनी या विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे.
युवा उद्योजक सिद्धेश पावसकर म्हणाले कि, भविष्यामध्ये विद्यार्थी स्वयंरोजगारामध्ये पुढे यावेत स्वतःचा उद्योग व्यवसाय त्यांनी चालू करावा. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आजमावून एखाद्या उद्योगांमध्ये पुढे यावे याचा विचार करून इयत्ता आठवी ते दहावी मधील मुलांना राष्ट्रीय शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय शालेय स्तरावर शिकवण्यासाठी अभियान सुरू केले. मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात कौशल्य दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौशल्य विषयी सविस्तर माहिती दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती विभागाच्या निदेशिका सौ. गायत्री देसाई यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत निदेशक भिकाजी गिरप, सौ.रिया देसाई, सौ.गायत्री देसाई यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मुक्ता कामत हिने कौशल्य दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सकाळी विद्यार्थ्यांनी शाळा ते बांदेश्वर मंदिर पर्यंत प्रभात फेरी काढली. तसेच यानिमित्ताने शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी मध्ये श्रीशा सावंत, नववी मध्ये सायमा आगा, दहावी मध्ये दत्ताराम सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब यांनी केले तर आभार सौ. रिया देसाई यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + sixteen =