You are currently viewing मालवण शहरातील अर्धवट कामांचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घ्यावे

मालवण शहरातील अर्धवट कामांचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घ्यावे

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची टीका

मालवण

मालवण न.प.मध्ये मुख्याधिकारी संतोष जिरगे प्रशासक आहेत. सहा महिन्यापासून ही जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दांडी येथे बीच महोत्सव घेत यशस्वी केला. बंदर जेटी मालवण येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीच असुन आमदार वैभव नाईक त्याचेही फुकाचे श्रेय घेत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. आमदारांना श्रेय घ्यायचे असेल तर मालवण शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे असा सल्ला इब्रामपपूरकर यांनी दिला आहे.

डीपीडीसी मधुन सर्वच आमदारांना मागणी केल्यास निधी मंजुर केला जातो. पण आलेला निधी खर्च करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग मुख्याधिकाऱ्यांनी केला. नाईक गेली सात वर्षे सत्तेत होते. मालवण नगरपालिकेच्या एका तरी प्रकल्पासाठी मोठा निधी वैभव नाईक निधी आणू शकलेत का? फक्त मंत्र्यांच्या दालनात फोटोशुट करण्यात मग्न होते. मालवण शहराची तुंबई झाली त्यावेळी मातोश्रीवर ‘मी निष्ठावान’ ची जपमाळ आमदार करत होते. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे ओरोस, कुडाळचा अतिरिक्त पदभार आहे.

नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने तसेच बेनामी ठेकेदारी असल्याने कचऱ्याचे टेंडर दुसरी मागणी करून कोणी भरले नाही. याची आम. वैभव नाईक यांना माहिती होती. शेवटी समोर पाऊस असल्याने मुख्याधिकाऱ्यांना नाशिकच्या ठेकेदाराला ठेका द्यावा लागला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच वैभव नाईकांनी मुख्याधिकारी यांना रस्त्यावर त्रास देण्याचे काम केले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्वार्थासाठी भर रस्त्यावर आमदारांनी झापणे जिल्ह्याची संस्कृती नाही.

एकीकडे महोत्सवाचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे शहरात पाणी तुंबल्याने ते अंगाशी येताच अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याचे काम आमदार करत आहेत.

आमदार पूर्णपणे अपयशी ठरले. भुयारी गटाराचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत तिथे आडारी डम्पिंग ग्राउंडचे दुषित पाणी रस्त्यावर येते. शहराला २४ तास वीज मिळणार अश्या बाता मारून देऊळवाड्यातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन केले. आज नागरिक सतत वीज खंडित होण्याने त्रस्त आहेत. शहरातील अनेक दिवे बंद आहेत. तिलारीचे पाणी मालवण शहराबरोबरच देवबाग तारकर्लीला नेणार अशी घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले? पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भुमिगत वीज वाहिन्यांचे पुढे काय झाले? ते जनतेला सांगावे. असेही अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =