You are currently viewing सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक – श्रीपाद नाईक 

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक – श्रीपाद नाईक 

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या घेतल्या जाणून

मालवण

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात लवकरच मुंबईत केंद्र व राज्य शासनाचे पर्यटन सचिव, अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मार्ग काढून पर्यटन व्यावसायिकांना दिलासा दिला जाईल असे केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज येथे स्पष्ट केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर कोकण रिजन आणि पर्यटन समिती- मासिया आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच येथील हॉटेल चिवला येथे सायंकाळी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, चंद्रशेखर पुनाळेकर, अशोक सावंत, लखमराजे भोसले, महेश मांजरेकर, नकुल पार्सेकर, सहदेव साळगावकर, धोंडी चिंदरकर, उमेश गाळवणकर, संध्या तेरसे, अवि सामंत, मंगेश जावकर, चारुशीला आचरेकर, मेघा गावकर यांच्यासह तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी विविध समस्या मांडल्या. पर्यटन जिल्हा होऊन तीन तप उलटले मात्र अद्यापही पायाभूत सुविधांची वानवा आहे. हंगामात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याने किनारपट्टीच्या बाजूने बंधाराकम रस्ता व्हावा, दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा. यासाठी त्याठिकाणी जाणारे रस्ते, इंटरनेट सुविधा यासह अन्य सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. जलक्रीडा व्यावसायिकांना परवाने हे जिल्ह्यातच उपलब्ध करून घ्यावेत यासाठी एक खिडकीची सुविधा निर्माण करावी. किनारे, गडकिल्ले स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी स्थानिकांसह पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग असायला हवा.

गेली बरीच वर्षे येथील पर्यटन व्यावसायिकांनी शासनाची कोणतीही मदत न घेता आपला व्यवसाय उभा केला आहे. मात्र या व्यवसायात व्यावसायिकांना बँकांची कर्जे मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटनाला सेवा उद्योग म्हणून मान्यता देण्यात यावी. यामुळे पर्यटन व्यावसायिकाला बँका कर्जे देतील. चिपी विमानतळावरून विमानाच्या फेऱ्या वाढवाव्यात. पर्यटन विभागाकडे शुल्क भरून अनेक व्यावसायिकांनी निवास न्याहरी योजना सुरू मात्र त्यांना पर्यटन विभागाकडून व्यवसाय मिळाला नाही. किनारपट्टी भागात हंगामात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात यावा. पावसाळी पर्यटन कसे बहरेल यादृष्टीने ही प्रयत्न करावेत अशा मागण्या व्यावसायिकांनी केल्या.

केंद्राने पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दत्तक घेतले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास होण्यासाठी जिल्ह्यासाठी वेगळी पॉलिसी तयार करावी. शासकीय समिती स्थापन करण्यात यावी. अन्य राज्यांचे जसे पर्यटनाचे ब्रँडिंग केले जाते तसे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ब्रँडिंग करण्यात यावे. मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक ठिकाण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. याठिकाणी आरमार म्युझियम व्हावे. मच्छीमारांचे, दशावतार कलेचे कल्चर सेंटर करावे. होम स्टे पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर द्यावीत जेणेकरून येथील पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + twenty =