You are currently viewing पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे कौतुक मात्र शिवसेनेने बॅनरबाजीचे केले प्रदर्शन – माजी आम. परशुराम उपरकर

पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे कौतुक मात्र शिवसेनेने बॅनरबाजीचे केले प्रदर्शन – माजी आम. परशुराम उपरकर

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेले पशुपक्षी प्रदर्शन अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या नियोजन करून पार पाडले. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले पण शिवसेनेने मात्र बॅनरबाजी करत शिवसेनेचे प्रदर्शन असल्याचे दाखविले आणि यातही मित्रपक्षांना डावलले. वास्तविक शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन असल्याने प्रगतशील शेतकऱ्यांचे कौतुक होणे आवश्यक होते परंतु शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे काम करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असल्याचा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला.निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नियोजनशून्य असल्याने असा कारभार चालला असल्याचे ते म्हणाले. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते. माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले, हे पशुपक्षी प्रदर्शन तीन दिवसापुरते मर्यादित न राहता याबाबत गावोगावी शेतकऱ्यांना योजनाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती देणे आवश्यक होते यातून प्रगतशील शेतकरी निर्माण झाले असते .पण अवघ्या तीन दिवसात हे प्रदर्शन आटोपते घेण्यात आले.

विशेष म्हणजे महिलांचा भरणा जास्त होता. 14 व्या वित्त आयोगातील महिलांच्या सहलीसाठी मिळणारा पैसा यानिमित्ताने वापरत महिलावर्गाला मोठ्या संख्येने प्रदर्शनाला आणण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांनी केल्याने प्रदर्शनाला गर्दी दिसून आली.परंतु लोकप्रतिनिधींची नियोजनशून्यता या निमित्ताने प्रत्ययास येतानाच या प्रदर्शनाचा जो उद्देश होता तो शेतकऱ्यांना सत्कारापासून वंचित ठेवल्याने बाजूला राहिल्याची टीका उपरकर यांनी केली. ते म्हणाले,

पावसाळा तोंडावर आला असताना नियोजनाची बैठक घेऊन गाळ काढण्याची घोषणा करण्यात आली. काही ठिकाणी टेंडर शिवाय गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. हा गाळ नदीच्या टोकावर ठेवण्यात येणार असून पावसात हा गाळ पुन्हा एकदा नदीत जाणार आहे .वास्तविक नदीतील गाळ मार्च-एप्रिलमध्ये काढणे आवश्यक होते परंतु आता गाळाचे पैसे गाळात जातील अशी भीती व्यक्त होत आहे असे परशुराम उपरकर म्हणाले.

पावसाच्या तोंडावर तळाशिल व अन्य ठिकाणी बंधाऱ्यांची उदघाटने करण्यात आली.वास्तविक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मार्च एप्रिलमध्ये उदघाटने झाली असती तर बंधाऱ्यांचा उपयोग झाला असता परंतु केवळ स्टंटबाजी केली जात असल्याचे उपरकर म्हणाले. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नियोजनशून्य असल्याने असा कारभार चालला असून पैसा विकासासाठी न वापरता फक्त ठेकेदाराना पोसण्यासाठी वापरला जात असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा